मुंबई : पाच वर्षांपूर्वी थैमान घालणारा कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असून, दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये एकाएकी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असून या राज्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनानं जारी केले आहेत. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाच्या NB.1.8.1 आणि LF.7 या नव्या कोरोना व्हेरिएंटचा संसर्ग डोकं वर काढत असून, मुंबईतसुद्धा अनेक रुग्णांना या संसर्गाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
ठाण्यात रविवारी 11 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. . यापैकी एकावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात, तर उर्वरित सहा जणांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ठाण्यातील एकूण बाधितांची संख्या आता 30 वर पोहोचली आहे. दरम्यान कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारातच ते वास्तव्य करत असल्यामुळे त्वरित खबरदारी घेण्यात आली आहे. येथील डॉक्टरांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी दिली. डोंबिवलीतही रविवारी कोरोनाच्य रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांच्या माहितीनुसार नव्या व्हेरिएंटमुळे विशेषतः ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि ज्यांना फुफ्फुसांचे आजार आहेत, अशा रुग्णांमध्ये अधिक त्रास दिसून येत आहे त्यामुळं अशा रुग्णांनी काळजी घेण्याची गरज असून नागरिकांना न घाबरण्याचं आवाहत करण्यात आलं आहे.
दक्षिण आशियामध्ये कोविड संसर्गामध्ये वाढ होण्यामागे JN.1 व्हेरिएंट कारणीभूत असल्याचं स्पष्ट होत आहे. जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा व्हेरिएंट संसर्गाच्या बाबतीत अधिक सक्रिय असला तरीही अद्यापही जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं या व्हेरिएंटला चिंताजनक यादीत नोंदवलेलं नाहीय. कोरोनाच्या या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास नागरिकांमध्ये सामान्य लक्षणं दिसत असली तरीही चार दिवसांमध्येच नागरिकांची प्रकृती सुधारते. या विषाणूच्या संसर्गामध्ये ताप येणं, सर्दी, खोकला, घशात खवखव, डोकेदुखी, थकवा अशा लक्षणांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला अशी लक्षणं दिसल्यास नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न राहता घरातच राहण्याचं आणि लक्षणं वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.