बामणोली : 'विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकली. त्यानंतर महानगरपालिका आणि आताच्या जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीला जनतेने कौल दिला आहे. आता सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतही जनतेचा कौल मान्य करून महायुतीच विजयी होईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे, अंकुश कदम, अजित सकपाळ, संजय मोरे, विशाल सपकाळ, सचिन कदम आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'स्थानिक राजकारण वेगळे असते. सर्वत्र वेगवेगळी समीकरणे आहेत. पण, राज्यातील आतापर्यंतच्या निवडणुकीत महायुतीच जिंकली आहे. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात. आताच्या निवडणुकीत आम्ही मैत्रीपूर्ण लढाईत टोकाची टीका करायची नाही, असे ठरवले होते. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक पातळीवर काय झाले माहिती नाही. पण, राज्यात महायुती असून, महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत.
कोयना पर्यटन महोत्सवाची तयारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही ते बोलले होते, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, कोयना पर्यटन महोत्सव होणार तो चांगलाच होईल. या माध्यमातून येथील निसर्ग पर्यटकांना पाहता येईल. तर, मंत्री दादा भुसे आणि उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील न्यायालयातील केसच्या प्रश्नावर न्यायालयात केस होती. त्यांनी माफी मागितली. केस निकालात निघाली आहे. चुकीच्या माहितीच्या आधारावर वक्तव्ये केली होती, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.