सातारा : सातारा येथील रविवार पेठेतील भाजी मंडईमध्ये भाजी विकण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी गेल्याच आठवड्यात तक्रार केली. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण करत जागा हडप करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले. दरम्यान, सातारा पालिकेने संबंधित ठिकाणचे अतिक्रमण काढले. त्यावेळी पुन्हा वादावादी झाली.
सध्या साताऱ्यातल्या भाजी मंडईत परप्रांतीयच स्थायिक झाले आहेत. त्यांनाच काही सातारकर स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांना पाठीशी घालत आहेत. हे परप्रांतीय शेतकरी नसले की शेतकऱ्यांच्या जागेवर जावून बसतात. त्यांना त्या ठिकाणाहून उठवायला गेले की, काही मंडळी चिरीमिरीसाठी त्यांना पाठबळ देत असतात. यावेळी शेतकरी वाद नको म्हणून मिळेल त्या ठिकाणी बसून भाजीपाला विक्री करत असतात. या दरम्यान इतर ठिकाणी बसल्याने त्यांच्या शेतमालाचे नुकसानही होत आहे. आज पुन्हा तोच वाद सुरु झाला असता राजकीय महिला नेत्याने आक्रमक होत शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत त्या मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु तो फोल ठरला.
भाजी मंडईत शेतकऱ्यांसाठी हक्काच्या जागा असताना तेथे परप्रांतीय कब्जा करतात अन कारवाई वेळी वादावादी होते. त्यावेळी त्यांना काहीजण मदत करत असल्यामुळे परप्रांतीयांची घुसखोरी या भाजीमंडईत दिवसेंदिवस वाढू लागली आहे.