सातारा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शाश्वत शेती आणि पाण्याचे योग्य नियोजन या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ या स्पर्धेसाठी आपला जिल्हा पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदवावा आणि विजेतेपदाचे बक्षीस मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह शेतकरी महिला उपस्थित होत्या.
पाणी फाउंडेशनने नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासाला आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला चालना दिली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, फार्मर कप स्पर्धा ही केवळ एक स्पर्धा नसून, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, गटशेती आणि बाजारपेठेची जोड देणारे एक उत्तम माध्यम आहे.
एकट्याने शेती करण्याऐवजी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केल्यास उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो ही संकल्पना ठेवून शेती करण्यासाठी सातारा जिल्ह्यात अनेक शेतकरी गटांची निर्मिती झाली आहे. यामध्ये महिला शेतकरी गटांची संख्या मोठी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, शेतकरी गटांनी आता एकत्र बसून निर्णय घेण्याची गरज आहे. या वर्षी पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कमी पावसात कोणते पीक घ्यावे, त्याला मार्केटमध्ये किती मागणी आहे याचा व उत्पादित मालाला भाव मिळेल का याचा अभ्यास करुनच पिकाची निवड करावी व उत्पादन खर्च कमी करावा, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
शेतकरी गटांनी केवळ कृषी उत्पादनावर अवलंबून न राहता शेतीपूरक जोडधंदा केला पाहिजे, प्रक्रिया उद्योग केले पाहिजेत. गट शेती करीत असताना त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. आदर्श गटाच्या निर्मितीबरोबर चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाला असला तरी पेरणीयुक्त पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुनच परेणी करावी.
प्रत्येक शेतकऱ्याने महाविस्तार, महाकृषी यासारखे शेतकऱ्यांनी उपयोगी असणारे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन अद्ययावत राहिले पाहिजे. त्याच बरोबर प्रत्येक शेतकऱ्यांने शेतकरी ओळखपत्र काढावे. मी स्वत: गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित राहून पेरणी करणार. प्रत्येक टप्प्यावर गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.