समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार

तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

by Team Satara Today | published on : 15 May 2025


कानपूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओला मोठे यश मिळाले आहे. समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यात डीआरडीओच्या संशोधकांना यश आले आहे. 

समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्यात रुपांतरीत करण्यासाठी नॅनोपोर्स मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेनचा शोध लावण्यात आला आहे. समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याची ही एक पद्धत आहे. याचा फायदा पाण्याची टंचाई असलेल्या भागांसह तटरक्षक दलालाही होणार आहे. डीआरडीओला भारतीय तटरक्षक दलाचे साह्य लाभले आहे. 

कानपूरमध्ये स्छित असलेल्या डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल स्टोअर्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबमध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये नॅनोपोर्स बहुस्तरीय पॉलिमर पडदा आहे, जो खारे पाणी शुद्ध करताना त्यातील खारट तत्वे बाजुला करतो. आठ महिन्यांच्या संशोधनातून हा पडदा तयार करण्यात यश आले आहे. 

सध्या तटरक्षक दलाच्या जहाजांवर प्रायोगिक स्तरावर या मेम्ब्रेनचा वापर केला जात आहे. या चाचणीवेळी समाधानकारक निकाल मिळाले आहेत. असे असले तरी तटरक्षक दलाला या तंत्रज्ञानाच्या वापराला परवानगी मिळविण्यासाठी ५०० तासांच्या ऑपरेशनल चाचणीतून जावे लागणार आहे. सध्यातरी हे तंत्रज्ञान तटरक्षक दलापुरतेच केंद्रीत असले तरी भविष्यात भारतीय बोटींवर, खलाशांना समुद्रात पाणी पिण्यासाठी वापरता येण्याची शक्यता आहे. तसेच किनारी भागात राहणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काही बदलांसह, समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना गोड पाणी पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) जहाजांवर खाऱ्या पाण्यासाठी डिसॅलिनेशन प्लांट वापरले जातात. खाऱ्या पाण्यात असलेल्या क्लोराइड आयनमुळे या मेम्ब्रेनची स्थिरता कायम राखणे कठीण जाणार होते. डीआरडीओने या दिशेने नवीन संशोधन करून टिकाऊ मेम्ब्रेन विकसित केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहकारमहर्षी; भाऊसाहेब महाराज
पुढील बातमी
सत्य घटनेवर आधारित ‘शातिर The Beginning’ या मराठी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

संबंधित बातम्या