नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये तोफगोळ्याचा भीषण स्फोट

दोन अग्निवीरांचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 11 October 2024


नाशिक : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणादरम्यान तोफगोळ्याचा भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन अग्निवीर जवानांचा मृत्यू झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोहिल सिंग (वय 20) आणि सैफत शित (वय 21) अशी मृत जवानांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

देशात अग्निवीर योजना सुरू झाल्यापासून अग्निवीर जवान याच परिसरात प्रशिक्षण घेतात. काल गुरुवारी (ता. १०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास जवानांची एक तुकडी शिंगवे बहुलाला फायरिंग रेंजमध्ये सरावासाठी गेली होती. या ठिकाणी दोन अग्निवीर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

यावेळी तोफेत गोळा लोड करत असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दोन्ही जवानांच्या शरीरात बॉम्बचे शेल घुसले. या घटनेत दोघ जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक अग्निवीर जखमी झाला. कॅम्पमधील इतर जवानांनी तिघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना जवान गोहिल सिंग आणि सैफत शित यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आता पोलीस आणि लष्कराकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

अग्निवीर योजना नेमकी काय?

भारतीय लष्कराला अधिक सक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये अग्निवीर योजनेची घोषणा केली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही योजना अंमलात आणली. अग्निवीर योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना ४ वर्ष लष्करात नोकरीची संधी दिली जाते. त्यानंतर २५ टक्के उमेदवारांची सशस्त्र दलात नियमित केडर म्हणून निवड होते. रिटायर्ड झालेल्या जवानांना इतर नोकरीत आरक्षण दिले जाते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेकरीता रु. 5409.72 कोटींची तिस-यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता
पुढील बातमी
रंगीबेरंगी फुलांनी कासवंडचे पठार बहरले

संबंधित बातम्या