ग्रंथ व्यासंग जगण्याचे व्यवहार ज्ञान शिकवितो

ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांचे प्रतिपादन

सातारा : निकोप समाज रचनेसाठी प्रगल्भ नेतृत्व गुण आवश्यक असतात आणि ते ग्रंथ व्यासंगातून जन्माला येतात. पुस्तकी पांडित्याइतकेच जगण्याचे भान देणारे व्यवहार ज्ञान महत्त्वाचे आहे. त्यासाठी उत्तम वाचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी केले.

येथील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये 24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी, माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी दीपक गमरे, समन्वयक प्रल्हाद पारटे, सुनीता कदम, डॉक्टर राजेंद्र माने, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, निवृत्त शिक्षणाधिकारी राजकुमार निकम व संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिता राजेपवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा संयोजन समितीच्या हस्ते शाल, कंदी पेढे देऊन सत्कार करण्यात आला. खांडेकर यावेळी पुढे बोलताना म्हणाले, सलग 24 वर्ष ग्रंथ प्रदर्शन सातार्‍यात होत आहे याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथापर्यंत घेऊन जाणे आणि ग्रंथ वाचनाविषयी प्रेम निर्माण करणे ही प्रक्रिया महत्त्वाची असून त्यामधून सुसंस्कृत वाचक घडत असतो. पुस्तक वाचन ही आयुष्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घरात एक छोटे ग्रंथालय तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

निकोप समाजासाठी समाजाला दिशा देणारे नेतृत्व महत्त्वाचे असते. या नेतृत्वाच्या पोषणासाठी ग्रंथ सत्संग महत्त्वाचा आहे. केवळ पुस्तकी पांडित्य असून चालत नाही तर जगण्याचे भान देणारे व्यवहार शिक्षण महत्त्वाचे आहे ते सुद्धा ग्रंथ वाचनातून येते. आज असा काळ आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता. मात्र एखादे काम करण्यामध्ये आपण निष्णात असायला हवे. पुस्तक प्रेमातून आपल्याला जगण्याचे भान येते आणि एक चांगले नागरिक म्हणून आपण देशाचा विकास करत असतो, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे म्हणाले, तनामनांत जागवी आज ग्रंथपालवी ही कविता आजच्या ग्रंथ महोत्सवाला चपखल लागू होते. रोज विद्यार्थ्यांनी वेगवेगळी पुस्तके वाचायला हवीत. त्यासाठी साहित्य वेध घेणारी तळमळीने शिकवणार्‍या शिक्षकांची पिढी सक्रिय असायला हवी. अशा शिक्षकांना शिक्षणव्यवस्थेने संवेदनशीलपणे टिपायला हवे. स्वधर्म म्हणून शिक्षकी पेशाकडे बघणार्‍या प्रवृत्ती आता फार कमी उरल्या आहेत केवळ कागदी कायदे सुसंस्कृत सत्संगी पिढी घडवू शकत नाही त्यासाठी ग्रंथ व्यासंगाचे वातावरण घराघरातून तयार व्हायला हवे अशी गरज प्रवीण दवणे यांनी सांगितली. ग्रंथ व्यासंग हा सातवा ऋतू आहे. ज्यामुळे अंतर्मनांचे जग सुंदर होते. यासाठी विद्यार्थ्यांनो पालकांकडे पुस्तकांचा आग्रह धरा, असे आवाहन त्यांनी केले. कागदी फतव्यांनी वाचन संस्कृती वाढणार नाही तर वाचक वाढले पाहिजेत आणि त्यासाठी ग्रंथांविषयीचे प्रेम असणारी पिढी निर्माण व्हायला हवी, असे दवणे म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. तत्पूर्वी शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी यांनी मनोगतामध्ये राज्याचे शैक्षणिक धोरण स्पष्ट केले. दीप प्रज्वलनाने चोविसाव्या ग्रंथ संमेलनाचे उद्घाटन झाले, असे राजीव खांडेकर यांनी जाहीर केले. ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे यांच्या अनुपस्थितीत घरात ग्रंथघर हवे आणि ज्ञानाचे लावण्य या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार शाल, कंदी पेढे देऊन करण्यात आला. राजीव खांडेकर यांच्या पत्नी जान्हवी खांडेकर व दैनिक प्रभात चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्तविक शिरिष चिटणीस यांनी, तर सूत्रसंचालन सुनीता कदम यांनी केले. राजकुमार निकम यांनी आभार मानले.


मागील बातमी
राज्याचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी येथे भरवणार
पुढील बातमी
भारतामध्येही अनेक विकासाच्या संधी : डॉ. अनिल नेरुरकर

संबंधित बातम्या