सातारा : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजने(जिहे कटापूर योजना) करीता सन 2022-23 च्या दरसुचीनुसार रुपये 5409.72 कोटी रुपयांच्या तिस-यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. या निर्णयामुळे खटाव, माण, कोरेगांव आणि सातारा तालुक्यातील एकूण 176 गावांमधील 60,437 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. या तीस-या सुधारित प्रशासकीय मंजूरीमुळे कायम दुष्काळी भाग म्हणून माण,खटाव तालुक्याला लागलेला कलंक निश्चितपणे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. याभागातील बळीराजाला सुखावणार हा निर्णय आहे अशा शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या तिस-या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गात 2 बॅरॅजेस, तासगांव, भाडळे, नेर क्र.3, नेर क्र.4,रणसिंगवाडी, शिरवली, उत्तरमांड पश्चिममांड येथील 8, उपसा सिंचन योजनांचे काम तसेच उर्ध्वगामी नलिका रांग क्रमांक 3 व 4 आणि तीन थेट गुरुत्वीय नलिका, यांचे काम होणार आहे.
आतापर्यंत जिहे कटापूर बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पंपगृह क्रमांक 1,2 व 3, पारेषण वाहीनी, कोल्हापुर पध्दतीचे 32 बंधारे, वर्धनगड बोगदा, आंधळी बोगदा, उर्ध्वगामी नलिका पहिली रांग इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. उर्ध्वगामी नलिका दुसरी रांगचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच नेर उपसा सिंचन योजना क्र.1 चे काम 30 टक्के, रेर उपसा सिंचन योजना क्रमांक 2 चे काम 55 टक्के आणि आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम 50 टक्के पूर्ण झाले असून, कामे प्रगतीपथावर आहेत.
याकामी राज्यशासनाच्या अंदाजपत्रकात सन 2023-24 करीता 150 कोटीरुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर सन 2024-25 करीता रुपये 200 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडाळाचे उपाध्यक्ष असल्यापासुन सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचन खाली आले पाहिजे, तसेच कायम दुष्काळी म्हणून लागलेला कलंक पुसण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. जिहे कटापूर योजनेसाठीही केंद्राचा हिस्सा मंजुर करून घेणे आणि अन्य तांत्रिक बाबीसाठी आमचे योगदान राहिले आहे. म्हणुनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह जलसंपदा मंत्र्यांसह संपूर्ण मंत्री मंडळाचे आणि कै.लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेसाठी योगदान देणा-या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतोच, तथापि दुष्काळग्रस्त भागातील जनतेच्या वतीने आभार मानतो, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.