पेपरफुटीबाबत असलेल्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, नवीन कायदे आणून काय होणार?’, काँग्रेसचा सवाल

by Team Satara Today | published on : 24 July 2026


नागपूर - पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावं लागले, या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीशी गैरवर्तन झाल्याच्या घटनेचा निषेध करत त्यांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून अशा घटना घडणे अत्यंत गंभीर असून, पोलिस विभागातील अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

पेपरफुटी रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. वारंवार पेपरफुटी होत असताना जबाबदारांवर कारवाई झाली नाही, त्यामुळे पुन्हा नवीन कायदे आणले तरी बदल होणार नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सोनम वांगचुक यांना २७ दिवस उपोषण करावे लागणे हे सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे. लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करण्याची सरकारची मानसिकता धोकादायक असून, याआधीच सरकारने वांगचूक यांच्याशी संवाद साधायला हवा होता अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

याशिवाय, मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी खासगी कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या नव्या पोर्टलवरून नागरिकांकडून शुल्क आकारण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला. कायद्यात स्पष्ट तरतूद नसताना सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकून खासगी कंपनीला फायदा करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सामान्य जनतेची लूट होऊ देणार नाही आणि या निर्णयाला तीव्र विरोध केला जाईल, अस काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन; 'इन्कलाम जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो', ३ मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी
पुढील बातमी
दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ साताऱ्यात युवकांचा एल्गार; मोर्चात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी

संबंधित बातम्या