सातारा : प्रतापसिंहनगर, सातारा येथील गुन्हेगार अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव याच्यासह त्याच्या टोळीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ‘घर बांधायचे आहे. पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत धमकी देवून दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लल्लन जाधव, दत्तात्रय आसावरे, ऋत्वीक नाईकनवरे, वेदांत साठे (सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) व अनोळखी दोघे यांच्या विरुध्द विक्रम वाघमारे (वय 42, रा. संगमनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 20 एप्रिल रोजी घडली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, ते नातेवाईकांसोबत दुकानात काम करत बसले होते. त्यावेळी दुचाकीवरुन संशयितांची टोळी तेथे आली. तक्रारदार विक्रम वाघमारे यांना उद्देशून ‘तू पोलिसांना मदत केल्यामुळे आमची घरे पडली. आमच्या घराच्या नुकसानीचा व जेलचा झालेला 10 लाख रुपयांचा खर्च दे. आम्ही तुझ्यामुळे रस्त्यावर आलो. आम्हाला दहा लाख रुपये. नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत संशयित तेथून निघून गेले.
या घटनेनंतर दि. 22 एप्रिल रोजी पुन्हा लल्लन जाधव याने तक्रारदार यांना फोन करुन ‘माझा बाप आता बाहेर आला आहे म्हणून मी गप्प आहे. दहा लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत दमदाटी केली. या धमकीमुळे पैसे दिले नाही तर तो माझ्यावर जीवघेणा हल्ला करु शकतो. यापूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता, असे वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर लल्लनसह त्याच्या टोळीवर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.