सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेत उभारावे, यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आग्रही आहेत. गुरुवारी त्यांनी मुंबईतील या जागेची पाहणी केली. तसेच राजभवनातील जागेवरच शिवरायांचे स्मारक उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा विषय अनेक दिवसांपासून धूपत आहे. अरबी समुद्रात स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर या ठिकाणी भूमिपूजन देखील झाले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही हे स्मारक मार्गी लागलेले नाही. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आता स्मारक उभारणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवार दि. 12 एप्रिल रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यामध्ये उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करुन हे स्मारक लवकर मार्गी लावावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उदयनराजेंच्या मागणीला ‘हिरवा कंदील’ दाखवला होता.
दरम्यान, उदयनराजेंनी सातार्यात पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील मलबार हिल येथील राजभवनाच्या 48 एकर जागेपैकी 40 एकर जागा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी देऊन त्या ठिकाणी स्मारक बांधावे, अशी मागणी केली होती. आता पुढे जाऊन उदयनराजेंनी गुरुवारी या जागेची पाहणी केली. तसेच या स्मारकासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते मी करणार, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.