सातारा : जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने या भागातील पर्यटनावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. 105 टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या फक्त 26 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या शिवसागर जलाशयाची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे.
वाढत्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून सिंचन आणि इतर वापरामुळेही जलाशयातील पाणी वेगाने कमी होत आहे. पाण्याची पातळी घटल्यामुळे जलाशयाच्या तळाशी असलेले जुन्या मंदिरांचे अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत. बोट व्यवसायावर परिणाम झाला असून अनेक बोटी बंद पडल्या आहेत. पुढील एक महिना पावसाला अवधी असल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यासह सातारा जिल्ह्यात देखील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम धरणांच्या पाणी पातळीवर देखील होऊ लागला आहे. कोयना धरणाचे शिवसागर जलाशय हळूहळू आटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्याला अजून एक महिना बाकी असल्याने काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हवामान विभागाने राज्यात 'हीट डिस्कम्फर्ट' जाहीर केला असून, सावधानतेचा इशारा दिला आहे. किमान कमाल तापमानात अवघ्या १० ते १३ अंशांचे अंतर उरल्याने अहोरात्र उकाडा जाणवत आहे. त्यामुळे पंखे, कुलरही शरीराला गारवा देण्यात कमी पडत आहेत.
राज्यातील हवामानात गत २४ ते ७२ तासांत मोठे बदल झाले असून, वातावरण पूर्ण शुष्क कोरडे झाल्याने सूर्याची किरणे थेट राज्यात तीव्रतेने पडत आहेत, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात अवघे १० ते १३ अंशांचे अंतर राहिले आहे. जणू दिवस-रात्रीचे तापमान एकच झाल्यासारखी स्थिती असल्याने राज्यात उकाडा जाणवत आहे.