...तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू

रिपाईच्या आठवले गटाचे नेते अशोकबापू गायकवाड यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 16 August 2025


सातारा : ज्याप्रमाणे महाविकास आघाडीची फुटाफुट महाबळेश्वरात झाली, त्याच प्रमाणे महायुतीची फुटाफुट महाबळेश्वरातूनच करु. शरद पवार यांनीही महाबळेश्वरातून निर्णय घेतला होता. तसेच महायुतीचे आमचे रिपाइंचे नेते रामदासजी आठवले यांच्या पक्षाला जर महायुतीत मानाचे स्थान निवडणूकीत दिले जात नसेल, कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान केला जात नसेल तर येत्या निवडणूकीत आम्ही वेगळा निर्णय घेवू, असा इशारा रिपाईच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वप्नील गायकवाड, अप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अशोकबापू म्हणाले, आता आम्ही येवू घातलेल्या निवडणूकांच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली आहे. कार्यकर्त्याची मते जाणून घेत आहोत. केंद्रात आठवले साहेब मंत्री झाल्यापासून 2014 पासून आम्ही महायुती सोबत सत्तेत आहोत. परंतु स्थानिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. आजपर्यंत महायुतीच्या घटक पक्षातील भाजपाकडून कोणत्याच आश्वासनांची पूर्तता झाली नाही. लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकांमध्ये आमचा विचार केला नाही. परंतु आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी आमच्या हक्काच्या आम्हाला जागा द्यायला हव्यात, जेथे जेथे आरक्षण आहे त्या त्या जागा रिपाईच्या आठवले गटाला सोडाव्यात. किमान सातारा जिल्ह्यात 6 जागा तरी सोडाव्यात, आम्ही महायुतीसोबत असलो तरीही आम्हाला आजपर्यंत वंचित ठेवले आहे. त्याकरता लवकरच भाजपाने आमच्यासोबत बैठक लावून एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, नियोजन समितीवर दोन नावे दिली होती तीही डावलली गेली. आमच्या मागून जे पक्ष महायुतीत आले त्यांना संधी दिली गेली. त्यामुळे आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, आमच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नसली तरीही निवडून न आणण्याची क्षमता आहे. कुणाला कुठे बसवायचे हे आम्ही नक्कीच ठरवू शकतो, असे सांगत अशोकबापू म्हणाले, आठवले साहेब सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि. 27, 28 रोजी येत आहेत. त्याच वेळी हा निर्णय घेवू. गटनिहाय माहिती मागवली असून कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहोत. आम्ही स्वबळाची तयारी सुरु ठेवली आहे. सध्याच्या या महायुतीच्या सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्याने सर्वसामान्य माणूस असुरक्षित आहे. निवडणूका नाही घेतल्या तर सर्वसामान्य माणूस उद्धवस्त होईल, अशीही भिती त्यांनी व्यक्त केली.

कुसगावचा लढा सुरुच राहिल
यावेळी बोलताना स्वप्नील गायकवाड म्हणाले, कुसगाव क्रेशरचे आंदोलन आता तुर्तास थांबले असले तरीही आमचा लढा सुरुच राहणार आहे. हा शेतकऱ्यांचा लढा होता. पायाला फोड येईपर्यंत चालत जावून मंत्रालयाच्या उंबऱ्यावर शेतकऱ्यांनी टाहो फोडला तरीही प्रशासनाला दयामाया आली नाही. नियम बनवाचे आणि ते वाकवायचे हे सत्ताधऱ्यांकडूनच शिकावे लागते. त्यामुळे हा सामान्याचा लढा आणि लढाई सुरुच राहिल, असाही इशारा स्वप्नील गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँकेची 75 वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत संपन्न !

संबंधित बातम्या