कराड : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 ते 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत, तसेच झालेल्या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये अडकले असल्याच्या बातम्या आहेत. त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती कुलकर्णी यांनी पृथ्वीराज बाबांना दिली.
यावेळी पृथ्वीराज बाबांनी कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली, तुम्हाला मदत नक्की मिळेल तुम्ही लवकरात लवकर कराड ला पोहचाल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पृथ्वीराज बाबांनी दिले. कुलकर्णी यांच्या सोबत बोलण झाल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी तात्काळ परराष्ट्र सचिव व महाराष्ट्राच्या सचिवांशी संपर्क साधून कराडच्या तसेच महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटकांना लवकरात लवकर आणण्यासाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली. प्रशासनाने जलद यंत्रणा कामाला लावावी असे सांगून कराड व सातारा मधील अडकलेल्या पर्यटकांची यादी सचिवांना पाठवली.
त्यानुसार महेश कुलकर्णी यांना संपर्क करून माहिती दिली. अगदी डायरेक्ट पुणे किंवा मुंबई पर्यंत जरी व्यवस्था नाही झाली, तरी दिल्ली पर्यंत तरी या तुमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था दिल्लीत केली जाईल, असा आधार पृथ्वीराज बाबांनी कराडच्या कुलकर्णी व क्षीरसागर कुटुंबियांना दिला.