शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 09 May 2025


सातारा  : सातारा जिल्ह्यातील शहिदांच्या माता-वीर पत्नी किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना शासकीय जमिन वाटपाबाबत शासनाचे धोरण असून सैनिकांबाबतचे प्रश्न यंत्रणेने संवेदनशीलतेने सोडवावेत ज्यांना शासकीय जमिनी देय आहेत अशांना पर्यायी जागा दाखविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शहिद जवानांच्या वारसांना जमिन वाटपा संदर्भातील कामकाजाचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, यांच्यासह शहिद जवानांचे वारस, उपस्थित होते.

युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थिती किंवा कोणत्याही लष्करी कारवाईत वीर मरण आल्यास अशा जवानांच्या अथवा अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नी किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना शेती प्रयोजनार्थ 2 हेक्टर कोरडवाहू जमिन देण्याबाबतचे शासनाचे धोरण आहे. तसेच सन 1971 भारत-पाक युध्दातील व सन 1962 च्या भारत-चीन युध्दातील सन 1965 च्या भारत-पाक युध्दातील व ऑपरेशन पवन मधील युध्दातील शौर्य पुरस्कार मिळालेल्या सैनिकांना किमान एक गुंठा, कमाल 3 गुंठे शेती प्रयोजनार्थ कोरडवाहू 2 हेक्टर जमिन देण्याची तरतूद आहे. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहिद जवान, माजी सैनिक यांच्या संदर्भातील प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील 40 शहिदांच्या वारसांना त्यांचा पसंतीक्रम मिळविण्यासाठी 4 पर्यायी जागा दाखविण्यात याव्यात. असेही त्यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीत त्यांनी सन 1999 मध्ये शहिद झालेले गजानन मोरे यांच्या वीर माता श्रीमती चतुराबाई मोरे यांना जागा वितरणाचे प्रमाणपत्र सन्मानपूर्व प्रदान केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
डी. पी. जैन कंपनीच्या स्टोअरला आग

संबंधित बातम्या