सातारा : सातारा तालुक्यातील लिंब येथील श्री सद्गुरु सदानंद स्वामी महाराज मठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्री कोटेश्वर अध्यात्मिक मुलांची वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या संस्थेचे उद्घाटन श्री. बाळासाहेब गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. सर्जेराव सावंत (जि.प. सदस्य), श्री. जितेंद्र सावंत (माजी उपसभापती), ह.भ.प. सोहम भारती महाराज, ह.भ.प. संजय महाराज वेळूकर, मृदंगाचार्य श्री. मदन कदम सर, ह.भ.प. दिलीप पवार महाराज, ह.भ.प. बबनराव सापते, सौ. सविताताई धनावडे, ह.भ.प. योगेश महाराज, श्रीपती माने, कृष्णात सावंत, नारायण महाराज आरफळ तसेच श्री. विजय महाराज मालगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
वारकरी संप्रदायाचे संस्कार, अध्यात्मिक शिक्षण आणि कीर्तन-भजन परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू करण्यात आली आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांना दररोज ह.भ.प. नवनाथ पाटील महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार असून त्यांना श्री. अमित पाटील, श्री. उमेश महाराज, श्री. विशाल महाराज आणि श्री. विठ्ठल महाराज यांचे सहकार्य मिळणार आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील मुलांमध्ये वारकरी संस्कृतीचे संस्कार रुजण्यास तसेच अध्यात्मिक आणि नैतिक शिक्षणाचा प्रसार होण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्यास वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.