सातारा : अंधश्रद्धा ही ठिकठिकाणी सर्वत्रच पहायला मिळत आहे. तिचा बिमोड करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे. अंधश्रद्धामुक्त समाज घडविण्याचे काम झाले पाहिजे. असा ध्यास प्रत्येकानेच बाळगला पाहिजे. असे रोखठोक विचार ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी मांडले.
डॉ.विलासखंडाईत यांनी पीएचडी संशोधनावर लिहिलेल्या,"जादूटोणाविरोधी कायदा : प्रशिक्षण कार्यक्रम" या मराठी भाषेतील पुस्तकाचा डॉ. अनिमिष चव्हाण यांनी इंग्रजी भाषेत केलेला अनुवाद व प्रा.डॉ. भानुदास आगेडकर आणि डॉ.अरुण सोनकांबळे यांनी हिंदी भाषेत केलेला अनुवाद अशा दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येथील लेक व्हियू हॉटेल गोडोली येथे आयोजीत करण्यात आला होता. तेव्हा परुळेकर बोलत होते. लोकांची फसवणूक करीत मनोरंजन वेगळे करण्याची गरज नाही. सध्या सरकारच मनोरंजन करीत आहे. अशी खुमासदार टिप्पणीही परूळेकर यांनी केली.
डॉ.भारत पाटणकर म्हणाले, "१९८३ साली बंधारा बांधण्यासाठी चाचपणी सुरू होती. त्याठिकाणी म्हसोबाचे स्थान असल्याने ठेकेदार पुढे यायला तयार नव्हते. शेवटी एक मुस्लिम इसमाने काम केले. भीतीतून अंधश्रद्धा निर्माण होत असतात. अंधश्रद्धा चळवळ राहिली नसून ती मोहीम मोठी निर्माण केली पाहिजे. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे दुःख मुक्तीकडे जाणे गरजेचे आहे. खरे स्वातंत्र्य मिळाले नसल्याने अनेक चळवळी निर्माण झालेल्या आहेत."
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.आ.ह.साळुंखे म्हणाले, "अनुवाद करणे सोपे नाही. तरीही अनुवादकांनी चांगल्याप्रकारचे काम केल्याने देश-विदेशात मूळ विषय पोहचेल. डॉ.खंडाईत यांनी संवेदनशील भावनेने अभ्यासपूर्ण पुस्तक निर्मिती केली आहे. त्यामुळे नक्कीच वैज्ञानिक दृष्टीकोनाची रुजवणूक होईल."
डॉ. प्रा.विनोद आर. वीर (त्रिपुडी) यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय थोडक्यात व नीटनेटका केल्याने सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरला. "जगभर प्रबोधनात्मक पुस्तकाचा लाभ घेता येईल. खरोखरच, देश-विदेशात पुस्तकांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच येणार आहे." अशा आशयाचे वक्तव्ये लेखक डॉ. विलास खंडाईत यांनी प्रास्ताविकपर कथन केले. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्यासह अनुवादीतांनीही सखोल असे मनोगत व्यक्त केले.
डॉ.भारत पाटणकर व राजू परुळेकर यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमास मदानदादा भोसले, राकेश साळुंखे,मनोज भोसले, सर्व खंडाईत परिवार, मित्र, नातेवाईक, शिक्षणप्रेमी, अंनिस या दोन्हीही संघटनेचे कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. अरुण जावळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.कांबळे यांनी आभार मानले. संध्याकाळी सुरू झालेला कार्यक्रम रात्रीपर्यंत चालला होता.शेवटी स्नेहभोजनाने सांगता करण्यात आली.