सातारा : भोसे (पाचगणी) येथील कुख्यात भू-माफिया संतोष शेडगे आणि त्याची पत्नी मनीषा शेडगे तसेच अनोळखी एका व्यक्तीवर नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी या पोलीस ठाण्यात १८ कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संतोष शेडगे फरार होता. असे असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने संतोष शेडगेचा पाय अजून खोलात गेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, नवी मुंबई मधील व्यावसायिक भरत अनंत घरत रा. तुर्भे, नवी मुंबई यांच्याशी संतोष लक्ष्मण शेडगे रा. भोसे (पाचगणी) ता. महाबळेश्वर याची 2007 मध्ये पाचगणी येथे ओळख झाली होती. यानंतर घरत यांना पाचगणी येथे बंगला घ्यायचा असल्याने जागेसाठी संतोष शेडगे याने मध्यस्ती केली होती. शेडगे याने घरत यांना बंगल्याची जागा शोधून दिली होती. यानंतर घरत यांनी पाचगणीतील मिठा इस्टेट येथे या जागेवर बंगला बांधला. यामुळे भरत घरत यांचा संतोष शेडगे यांच्यावर विश्वास बसला. कालांतराने भरत घरत आणि संतोष शेडगे यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला. याचाच गैरफायदा संतोष शेडगेने घेतला.
भरत घरत हे नवी मुंबईतील व्यवसायिक असल्याने त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, हे संतोष शेडगे याला माहिती असल्याने त्याने भरत घरत यांच्याकडे माझ्याकडे पाचगणी, महाबळेश्वर तसेच वाई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी विक्रीस आहेत. आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा आपल्यास मोठा फायदा होईल, असे सांगितले. संतोष शेडगे यांच्यावर भरत घरत यांचा विश्वास असल्याने त्यांनीही या गोष्टीला होकार दिला. त्यानंतर संतोष शेडगे यांच्या सांगण्यानुसार भरत घरत यांनी सन 2007 ते 2011 दरम्यान घेरा केंजळ ता. वाई येथे 655 एकर, वेलंग ता. वाई येथे ७२.५ एकर, वाडकरवाडी येथे दोन एकर 25 गुंठे, मौजे महाबळेश्वर येथे 22 गुंठे, पाचगणी येथील मिठा इस्टेट येथील 450 चौमी भूखंड वरील बंगला, भूखंड क्र 13 मधील बंगला, भुखंड क्र. चार मधील 300 चौमी जागेतील कार्यालय, चिखली येथील 16 एकर 73 गुंठे जागा, चार गुंठे जागा तसेच वाई येथील पुष्पलक्ष्मी डेव्हलपर्स मधील 86 गुंठे जागेपैकी 25% हिस्सा. या मिळकतींमध्ये भरत घरत यांनी संतोष शेडगे याच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली होती. शेडगे याला या मिळकतीमध्ये गुंतवणुकीसाठी भरत घरत यांनी रोख रक्कम तसेच बँकेच्या चेकच्या स्वरूपामध्ये रकमा दिल्या होत्या.
दरम्यान भरत घरत यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याने व संतोष शेडगे वरील असलेल्या विश्वासामुळे भरत घरत यांना गुंतवणूक केलेल्या जमिनी कशाप्रकारे घेतल्या, याच्याकडे लक्ष न दिल्याने संतोष शेडगे ने याचा गैरफायदा घेतला. या जमिनी भरत घरत व त्यांच्या पत्नीच्या नावावर घ्यायच्या होत्या. त्या जमिनी त्याने स्वतःच्या व स्वतःच्या पत्नीच्या नावावर घेतल्या. एकेकाळी फकीर असलेल्या संतोष शेडगेकडे चार चाकी गाडीच काय, परंतु दुचाकी नव्हती. असे असताना भरत घरत यांनी त्याला आपली नवी कोरी इनोवा कार त्याला दिली होती. ही कारही त्याने परस्पर विकली. कालांतराने भरत घरत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संतोष शेडगे याला भेटण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या आयुष्याची सर्व कमाई मी तुम्हाला दिली आणि तुम्ही माझा असा विश्वासघात केला, असा प्रश्न भरत घरत यांनी संतोष शेडगे याला केला असता त्याने सर्व काही तुमचीच चुकी आहे, असे उलट उत्तर घरत यांना शेडगे याने दिले. शेवटी घरत यांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला.
गेल्या अनेक वर्षांमध्ये घरत यांनी संतोष शेडगे कडे आपल्या गुंतवणूक केलेल्या मिळकतीसाठी व पैशांसाठी तगादा लावला. मात्र भू - माफिया असणारा संतोष शेडगे सराईत असल्याने त्याने भरत घरत यांच्या केलेल्या विनंत्या धुडकावून लावल्या. शेवटी नाईलाजाने भरत घरत यांना पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठवावा लागला. घरत यांनी संतोष शेडगे, त्याची पत्नी मनीषा शेडगे व एका अनोळखी इसमाविरोधात नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल केला. संतोष शेडगे ला त्याच्यावर व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो कुटुंबासह फरार झाला. गेले तीन महिने तो फरार आहे. शेवटी अटकपूर्व जामीनासाठी त्याने आपल्या वकिलांकरवी नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. घडलेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता न्यायालयाने त्याच्यासह त्याच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्याने संतोष शेडगे चा पाय अजून खोलात गेला असून त्याने पाचगणी, महाबळेश्वर व वाई तालुक्यात केलेल्या अनेक भानगडी आता चव्हाट्यावर येणार आहेत. संतोष शेडगेने गेल्या दीड दशकामध्ये शेकडो लोकांना फसवून त्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. याबाबत अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. परंतु लोकांना फसवून कमावलेल्या पैशाच्या जोरावर तो ‘शेठ’ बनल्याने पोलिसांनीही वेळोवेळी त्याला सहकार्य केले होते. नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल होताच तो परागंदा झाला आणि शेवटी न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने या भू-माफियाला लवकरच जेलचे वासे मोजावे लागणार आहेत, हे नक्की.