सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल

विनोद कुलकर्णी यांच्या सत्कारप्रसंगी डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 13 June 2025


सातारा : सातारा ही ऐतिहासिक वारसा असलेली आणि प्रबोधनाची संस्कृती असलेली भूमी आहे. त्यामुळे सातारा येथे होणारे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्य जगताला दिशा देणारे ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

 आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे, आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे डॉ. संदीप श्रोत्री श्रीराम नानल शिरीष चिटणीस, मुकुंद फडके उपस्थित होते.

 डॉ. सदानंद मोरे म्हणाले, सातारा शहराने आजपर्यंत महाराष्ट्राला आणि देशाला अनेक आदर्श घालून दिले आहेत. आता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक वेगळा पॅटर्न तयार करण्याची संधी सातारकरांना मिळाली आहे. इतिहास घडवण्याच्या आणि लिहिण्याचे कार्य हे सातार्‍यातूनच झाले. साहजिकच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुद्धा सातार्‍याची एक वेगळी तर्‍हा म्हणजेच पॅटर्न समोर यायला हरकत नाही. सातारा येथे होणार्‍या या साहित्य संमेलनामुळे साहित्यिक चळवळीला बळ मिळेल, असा विश्वासही डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना विनोद कुलकर्णी यांनी आपला साहित्य संमेलनापर्यंतचा प्रवास स्पष्ट केला. शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून केलेले विविध उपक्रम आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून सातारला मिळालेले साहित्य संमेलन आणि त्यासाठी करावे लागलेले परिश्रम याचा उलगडा त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते आपला विशेष सत्कार होत आहे ही भाग्याची गोष्ट असल्याचेही त्यांनी नम्रपणे नमूद केले.

नितीन देशपांडे यांनी सातार्‍यातील उद्योग जगत या संमेलनाच्या पाठीशी निश्चितच उभे राहील आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आमचाही निश्चित हातभार लागेल, असे आश्वासन दिले.

 शिरीष चिटणीस यांनी सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणे हा विनोद कुलकर्णी यांच्या ध्यासाचा आणि धडपडीचा परिणाम आहे. म्हणूनच त्यांचा हा या ठिकाणी सत्कार होत आहे, असे सांगितले.

मुकुंद फडके म्हणाले, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचन संस्कृती आणि साहित्य संस्कृती वाढवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध आदर्श उपक्रम राबवता येऊ शकतात. सर्वानी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून हे संमेलन यशस्वी करायला हवे.

डॉ संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम नानल यांनी आभार मानले. या सत्कार सोहळ्याला पुस्तकप्रेमी समूहाचे सदस्य तसेच साहित्य प्रेमी आवर्जून उपस्थित राहिले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवा!
पुढील बातमी
सातारमध्ये शिवसेनेच्या वतीने विमान अपघातग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली

संबंधित बातम्या