सातारा : खिंडवाडी येथे 8 मार्च रोजी पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनधारकांकडून धडक लागल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. अर्थात यासाठी डोंगरावर लावण्यात येणारे वणवेच याला कारणीभूत ठरत आहे. बिबट्याचा अपघाती मृत्यू ही गेल्या आठ वर्षातील ही पाचवी घटना असल्याचे वनविभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याचे मृत शरीर ताब्यात घेऊन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याची माहिती आहे.
सातारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शासन या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजना करीत आहेत. खिंडवाडी परिसरात सातत्याने वन्यजीव प्राण्यांचे महामार्गावरील होत असलेले अपघात हे चिंतेची बाब आहे. पर्यावरण प्रेमी व वन्यजीवप्रेमी यामुळे चिंतेत आहेत. या मार्गावर नेहमीच वन्य प्राण्यांच्या विशेषता बिबट्याच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत.
अज्ञात वाहनाने शनिवारी रात्री उशिरा बिबट्याला धडक दिल्यामुळे अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या बिबट्याची पूर्ण वाढ झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. खिंडवाडी परिसरामध्ये वनविभागाला जोडणारा ओव्हरपास अथवा अंडरपास करण्यात यावा अशी बऱ्याच वर्षाची मागणी आहे. मात्र या मागणीची अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही दखल घेतलेली नाही.