छगन भुजबळ यांचा नव्या मंत्रिमंडळतील पत्ता कट

by Team Satara Today | published on : 16 December 2024


मुंबई : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपुरातील राजभवनावर मोठ्या थाटामाटात पार पडला. फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात 39 आमदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. यात 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. पण अनेक बड्या नेत्यांचाही पत्ता कट झाला.  मंत्रिपदाची इच्छा बाळगून असलेल्या अनेकांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे काही नेत्यांनी आपली उघड नाराजीही व्यक्त केली आहे.  यात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मी नाराज आहे, असं सांगत आपली नाराजी बोलून उघडपणे बोलून दाखवली आहे.

” मला मंत्रिपद का मिळालं नाही, ते न देणाऱ्यांना विचारा, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावलत आहोत, असं मला सांगितलं गेल,  मी नाराज आहे. अजित पवारांकडे जाण्याची गरज नाही. मी जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं त्याचंच मला बक्षीस मिळालं मी सामान्य कार्यकर्ता मला डावललं काय आणि फेकलं काय. काय फरक पडतो.  पण छगन भुजबळ संपणार नाही.” असा सूचक इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.  तसेच, मी ओबीसींसाठी लढलो,  जरागें पाटील यांना अंगावर घेतलं. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यशही मिळाले. अर्थात त्यात लाडक्या बहिणींचाही वाटा आहे. पण  तितकाच ओबीसींचा सपोर्टही आहे. ओबीसींच्या लढाईमुळेच निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. असं ज्यांना वाटते त्यांचा मी आभारी आहे.

दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्याने  राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, विजय शिवातारे हेदेखील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.  तीनही नेते साधे भेटायलाही तयार नाहीत, अशी खंतही शिवतारे यांनी व्यक्त केली आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य करत थेट भुजबळांच्या वर्मावरच बोट ठेवलं आहे. छगन भुजबळ हे नाराज असले तरी  हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. ते जेव्गा आमच्या राष्ट्रवादीत होते, तेव्हा आम्ही त्यांच्या यथोचित सन्मान केला होता. त्यावेळी त्यांची जागा नेहमी अध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारीच असायची, पण गेल्या दीड-दोन वर्षांत जे काही झालं त्यात आता मला पडायचं नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लागावला आहे.

रेडिसन ब्लू हॉटेलमधून भुजबळ बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी गर्दी केली असता ते मोठ्या आवाजामध्ये, “राष्ट्रगीताला हजर राहतो आणि मग बोलतो जा,” असं म्हणाले. त्यानंतरही पत्रकारांनी त्यांच्या तोंडासमोर आपल्या चॅनेलचे बूम आणल्याने भुजबळ अधिक संतापत थोड्या चिडक्या स्वरातच, ‘राष्ट्रगीत आहे आता राष्ट्रगीत,’ असं म्हणाले आणि तिथून निघून जात होते. त्यावेळेस पत्रकारांचा गराडा त्यांच्याभोवती कायम असल्याचं पाहून त्यांनी, ‘अरे राष्ट्रगीत आहे. माझं ते चुकेल. मला राष्ट्रगीताला जायचं आहे,’ असं म्हटलं आणि ते निघून गेले. बराच वेळ भुजबळ आपली गाडी कुठे आहे हे शोधत होते.

दुसरीकडे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, आपल्या पक्षाचे ज्या आमदारांना मंत्री करण्यात आले आहे ते सर्व आमदार अडीच वर्षेच सरकारमध्ये राहतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अडीच वर्षानंतर अन्य आमदारांना संधी दिली जाणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सीमा भागात रविवारी विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन
पुढील बातमी
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

संबंधित बातम्या