शेख हसीना यांना परत पाठवायचे की नाही हे भारतावर अवलंबून 

युनूस सरकारने शेख हसीनसह त्यांच्या पक्षातील अनेक लोकांचे राजकीय पासपोर्ट केले रद्द 

by Team Satara Today | published on : 02 September 2024


नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीन त्यांच्या देशात झालेल्या उठावानंतर भारतात शरणार्थी म्हणून आल्या आहेत. बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आहे. या सरकारला अजून बांगलादेशातील हिंसाचार थांबवण्यात यश आले नाही. त्याचवेळी अंतरिम सरकारचे परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन यांनी माजी पंतप्रधान शेख हसीन यांच्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, बांगलादेशमधील न्यायालयाने आदेश दिला तर ते माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतातून परत आणण्याचा प्रयत्न करतील. परंतु शेख हसीना यांना परत पाठवायचे की नाही हे भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्यावर शंभराहून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. ५ ऑगस्टपासून हसीना भारतात आश्रय घेत आहेत. दुसरीकडे युनूस सरकारने शेख हसीनसह त्यांच्या पक्षातील अनेक लोकांचे राजकीय पासपोर्ट रद्द केले आहेत.

परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन म्हणाले, की देशातील न्यायालयांनी मला शेख हसिना यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले तर मी तशी प्रक्रिया सुरु करेल. परंतु शेख हसीनाला परत पाठवायचे की नाही हे भारतावर अवलंबून असेल. बांगलादेशचा भारतासोबत प्रत्यार्पण करार आहे. त्या करारानुसार भारत शेख हसीन यांना बांगलादेशच्या ताब्यात देऊ शकतो. त्यासाठी भारतातही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून शेख हसीना यांना परत आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील.

5 ऑगस्ट रोजी शेख हसीना देश सोडून गेल्या आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि त्यांच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्यांविरोधात 100 हून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. बांगलादेशात अनेक आठवडे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन सुरु आहे. त्यात 600 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यामुळे विविध नेत्यांवर 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शेख हसीन कमी काळासाठी भारतात आल्या आहेत. परंतु त्यांची प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशने केल्यावर काय भूमिका घेणार? यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षण, ग्राम विकासासाठी उपग्रहांचा वापर सर्वोत्तम पर्याय : शास्त्रज्ञ डॉ शिरीष रावण
पुढील बातमी
अजितदादांची निवडणुकीआधी बारामतीकरांना साद

संबंधित बातम्या