सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये मान्सूनचा जोर चांगलाच वाढला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयना नगर मध्ये गेल्या 24 तासात 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणामध्ये सध्या 17.43 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. दमदार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील रस्ते जलमय झाले असून शेतांमध्ये तळी झाली आहेत.
गेल्या तीन चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सातार्यात काही काळ उघडीप घेतलेल्या पावसाने शहरातही सकाळपासून चांगलाच जोर धरला. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. धरणात प्रति सेकंद 1336 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या 17.43 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. मुबलक पाणी साठ्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासली नाही. नवीन तांत्रिक वर्ष सुरू होताना देखील धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक होता.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना नगर, नवजा तसेच महाबळेश्वर मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेल्या 24 तासात कोयना नगर मध्ये सर्वाधिक 104, नवजा येथे 80 मिलिमीटर, तर महाबळेश्वर मध्ये 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी जोरदार पाऊस बरसला. गेल्या काही पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यात कोरेगाव, खंडाळा, सातारा, वाई, महाबळेश्वर या चार तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. कराड-चिपळूण मार्गावर वाजेवाडी गावच्या हद्दीमध्ये गेल्या दोन वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. तेथील तात्पुरता बनवलेला कच्चा रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
पावसामुळे रस्ते आणि शेतांची तळी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतीच्या कामावर देखील पावसामुळे मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी मशागतीही पूर्ण झालेल्या नाहीत. पेरणीची इतर कामे पावसामुळे खोळंबली आहेत. या दुहेरी चक्रात अडकलेल्या शेतकर्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम खडतर जाणार असल्याची चिन्हे आहेत. सातारा शहरातही सकाळपासून जोरदार पावसामुळे विक्रेते, दुकानदार, शालेय विद्यार्थी यांचे अतोनात हाल झाले. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून त्याचा वाहतूक किंवा मोठा परिणाम झाला. पुणे-बेंगलोर महामार्गावर सुद्धा दिवसभर धिम्या गतीने वाहतूक सुरू होती.