नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 20 August 2025


सातारा : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती व्यवस्थ्ज्ञापन कक्ष कार्यरत ठेवा. येणाऱ्या प्रत्येक कॉलला सकारात्मक प्रतिसाद द्या. तसेच कॉलच्या नोंदी ठेवा, ज्या पुलांवर पाणी येते ते पूल वाहतूकीसाठी तातडीने बंद करा.  त्याठिकाणी बॅरीकेटींग लावून सूचनाफलक लावा. अन्य मार्गाने वाहतूक वळवा.  पावसाचा वाढता जोर पाहता आवश्यकता भासणाऱ्या ठिकाणी नागरिकांचे व पशुधनाचे तातडीने स्थलांतरण करा आणि अनुषंगिक सुविधांची आवश्यक ती उपलब्धता ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. नदीकाठच्या गावांनी सतर्कत बाळगून नागरिकांनीही पुराच्या पाण्यात वाहने नेण्याचे अनाठायी धाडस करु नये, पाण्यात उतरु नये असे आवाहन केले. 


जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दुरदृश्यप्रणालीवरुन जिल्ह्यातील पर्जन्यस्थितीचा आढावा घेतला.  यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य यंत्रणांचे प्रमुख उपसित होते. 


धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढता जोर पाहता कोयनेसह सर्व धरणातील विसर्ग वाढवावा लागू शकतो. कोयना, कृष्णाच्या अनुषंगाने पाटण कराड तालुक्यांनी विशेष दक्ष राहावे, सतत पाऊस सुरु असल्याने जेवढा पाण्याचा येवा धरणात येत आहे तेवढे पाणी सोडले जात आहे.   त्यामुळे कोयना धरणातून एक लाख क्युसेकने पाणी सोडले जाऊ शकते.   अशा परिस्थितीत  जी कुटूंबे बाधित होतात अशी कुटूंबे तात्काळ स्थलांतरीत करावीत, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले,  ज्या रस्ते व पुलांवर पाणी येऊन वाहतूकीसाठी बंद झाले आहेत त्याची माहिती ताबडतोब जिल्हा प्रशासनाला द्यावी.  दरडप्रवण गावात तलाठी ग्रमासेवक यांनी फिल्डवर जाऊन पाहणी करावी व लोकांशी संवाद साधावा. वैद्यकीय निकड असणारे रुग्ण, गरोदर महिला अशा रुग्ंणांची माहिती संकलीत करुन ठेवावी. विशेषत: महाबळेश्वर, जावळी, पाटण या भागात अधिक दक्षता घ्यावी.  जिल्ह्यात धबधब्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून अशा ठिकाणी पर्यटक अडकले असल्यास माहिती घ्यावी, ज्या बसस्थानकांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो अशा ठिकाणी प्रवासी अडकले आहेत का याची शहानिशा करावी, आणि अशी स्थिती असल्यास अशा प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.  असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी दिले.  शहरे व शहरांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये नैसर्गिक ओढे नाले यांचे पाणी वाढून घरात शिरु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. या बैठकीत महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी नदीकाठच्या येरणे बु. येथील  आठ कुटूंबातील  18 व्यक्ती, वाई शहरातील 40 कुटूंबे, कराड शहरातील पत्राचाळ, पाटण कॉलनी येथील 21 कुटुंबातील 81 लोक यांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.  तांबवे गावातील सखल भागातील 48 कुटुंबांनाही स्थलांतरीत करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी संबंधित प्रांताधिकारी यांनी दिली. बोट व अनुषंगिक साहित्य पाटण-2, कराड-4, वाई-1, खंडाळा-1, महाबळेश्वर-1, दहिवडी (म्हसवड न.पा)-1 या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.


यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी तालुकानिहाय पर्जन्यस्थीतीचा समग्र आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. यामध्ये   सर्व विभाग प्रमुख व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी 24x7 हजर रहावे.   नदीकाठच्या व दरड प्रवण गावांना सतर्क राहण्याविषयी कळवावे.  नदी-नाल्याच्या, पूलावरुन पाणी वाहत असल्यास तात्काळ रस्ता बॅरिकेटिंग करुन वाहतूकीस बंद करणे. तसेच पुराचे पाणी ज्या गावामध्ये शिरलेस अशा नदीकाठच्या लोकांना दवंडी देवून अथवा ध्वनीक्षेपक यंत्रणेव्दारे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होणेसाठी आवाहन करावे, अथवा प्रशासनामार्फत स्थलांतरित करावे.  धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करावे.   आरोग्य विभाग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय मधील मेडिकल ऑफीसर व स्टाफ यांना मुख्यालयी 24x7 हजर राहणे बंधनकारक राहील.   स्थलांतरित नागरिकांना व पूरामूळे बाधित होणान्या नागरिकांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा.  त्याचप्रमाणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश लसींचाही साठा उपलब्ध ठेवावा.   वाहतूक व्यवस्था सुरळित चालू ठेवणे एसटी विभागामार्फत ज्या-ज्या ठिकाणी पूलावरुन पाणी वाहत असेल त्या-त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत एसटी वाहतूक सुरु ठेवू नये. (पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.)  सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड कोसळून, झाडे उन्मळून ज्या ठिकाणी रस्ते वाहतूकीसाठी बंद झालेले आहे असे अडथळे तात्काळ दूर करावेत.  वाहतूक पर्यायी सुरक्षित मार्गाने चालू राहिल याबाबत कार्यवाही करावी.   पोलीस विभागाने पुरामुळे ज्या ठिकाणी रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेलेले आहेत अशा ठिकाणी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी बॅरिकेटिंक करुन सूचना फलक लावावेत.   मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असलेले पाटण, महाबळेश्वर, जावली येथील धोकादायक ठिकाणे इत्यादी ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावे.  आपत्कालीन साहित्य उपलब्ध ठेवून बाधित झालेल्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाणेसाठी उपलब्ध करुन दयावे. तसेच आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीवरक्षक, लाईफजॅकेटस्, लाईफ बॉईज, रेस्क्यू बोटी इत्यादी साहित्य सुस्थितीत ठेवाव्यात, याकामी सर्व संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी संबंधित विभागांशी समन्वय ठेवून उपरोक्त उपाययोजना कराव्यात. 



पर्यटन ठिकाणी सातारा जिल्हयातील नदी, तलाव, धरणे, धबधबे, गड-किल्ले, जंगल इत्यादी ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येतात त्या ठिकाणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्व विभाग, पोलीस विभाग व इतर आवश्यक त्या यंत्रणा सोबत उपविभागीय अधिकारी यांनी समक्ष भेटी देऊन आपत्ती व्यवस्थापन व सक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्थळ पाहणी करावी.  महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) व सडावाघापुर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबा व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील एकीव या धबधब्याच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.  अशा परिसरात धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करुन त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियंत्रण रेषा आखावी.  व त्या नियंत्रण रेषेच्या पुढे कोणत्याही परिस्थितीत पर्यटक जाणार नाहीत अशी व्यवस्था कार्यान्वित करून तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र व प्रवेश बंद अशा आशयाचे स्पष्ट सूचना फलक लावावेत. 


संभाव्य आपत्ती प्रवण, प्रेक्षणिय स्थळे ज्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नाही अशा सर्व पर्यटनस्थळे, डोंगरकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करणेत यावेत आणि अशा ठिकाणी आवश्यक त्या अधिसूचना संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी तात्काळ निर्गमित कराव्यात आणि त्याचे काटेकारपणे अंमलबजावणी करावी.



गिर्यारोहण, जलपर्यटन इत्यादी ठिकाणी त्या त्या स्थानिक परिसरातील NGOs, होमगार्डस, अशासकीय संस्था, गिर्यारोहक, आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवक इत्यादीची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी पर्यटनासाठी त्यांची नेमणूक करावी, त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रथमोपचार सुविधा असलेल्या अँब्युलन्स यांची देखील व्यवस्था करावी.  उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आहेत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांना अशा प्रत्येक पर्यटनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व आवश्यकता असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत त्याबाबतीत योग्य ते प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करावेत.


बहुतांशी पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते व त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होतो. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग स्थानिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होते हे टाळण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या., सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग) यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या रस्त्यांवावत सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. त्यामध्ये रस्त्याची दुरुस्ती, गतिरोधक, दिशादर्शक फलक, सुचनांचे फलक इत्यादीबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेवून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
पुढील बातमी
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट

संबंधित बातम्या