सातारा : महाराष्ट्र संघटन सृजन अभियान सुरुवात सातारा काँग्रेस कमिटीतून करण्यात केली जात आहे. याचा उद्देश सातारा जिल्हयासह राज्यात काँग्रेस पक्ष मजबुत करणे आहे. सर्वसामान्य जनता, महिला व शेतकरी यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवत असून भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेस सक्षम होत असल्याचे मत हिमाचल प्रदेशचे आ. मलेंदर राजन यांनी व्यक्त केले.
साताऱ्यात काँग्रेस पक्षाची गावपातळीपासून पुनर्बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरू केलेले संघटन सृजन अभियानाची सुरुवात साताऱ्यातून केली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख, अजित पाटील-चिखलीकर, राजेंद्र शेलार, सुषमा राजेघोरपडे, धनश्री महाडिक, रजनी पवार उपस्थित होत्या.
आ. राजन म्हणाले, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष हे वर्ष संघटन बांधणीचे वर्ष म्हणून साजरे करत आहे. पक्षाची ताकद केवळ नेतृत्वाचा करिष्मा व त्यांच्या भाषणांपुरती मर्यादित न राहता, ती प्रत्यक्ष बूथ स्तरावर दिसली पाहिजे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी गाव पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत पक्ष संघटनेचे पदाधिकारी नव्याने नियुक्त करण्यात येणार आहेत.
हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. जिल्हयात गाव पातळीवर व्यापक मोहीम राबवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यात पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली जाणार आहे. तळागाळात काम करण्याऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले