छ. संभाजीनगर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांच्या रडारवर असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांचा आहे.
करुणा शर्मांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी करुणा मुंडे यांचा फॉर्म 30-10-2024 ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता. त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालीय ती करप्ट प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे. त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून, तिचा कुठे उल्लेख केलेला नाही.
तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत, मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केला नाही.
ही सगळी माहिती त्यांनी लपवून ठेवलेली आहे. कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठली माहिती लपवून ठेवली तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्याला पुराव्याची गरज नाही. कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत"
दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेला वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यासह पाच जणांना अटक झाली आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आणखी दोन आरोपींचा यात समावेश करण्यात आला आहे. या घटनेत सरपंच देशमुख याला झालेल्या मारण्यात तब्बल 56 जखमा अंगावर आढळून आल्या. ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी 41 इंच होती.
9 डिसेंबरला केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.