भारतीय बौद्ध महासभेचे लाक्षणिक उपोषण

बुद्धगया मधील महाबोधी बुद्ध विहार आंदोलनाला दिला पाठिंबा

by Team Satara Today | published on : 02 April 2025


सातारा : बिहार राज्यातील बुद्धगया येथे महाबोधी बुद्ध विहार बुद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याच्या मागणीला जोर चढला आहे. तसेच 1949 चा मंदिर कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, या दोन मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी सातार्‍यात लाक्षणिक उपोषण केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महासभेच्या सदस्यांनी आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.

बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक भालेराव, सरचिटणीस दिलीप फणसे, सचिन आढाव, वंचित आघाडीचे चंद्रकांत खंडाईत इत्यादी सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. या निवेदनात नमूद आहे की, महाबोधी महाविहार ही वास्तू हिंदू धर्मियांच्या ताब्यात असल्याने तथागतांच्या विचाराला बाजूला ठेवून सर्व विधी होत आहेत. तथागतांच्या विचारांची मोडतोड होत आहे व जगात चुकीचा संदेश जात आहे. बुद्धगया येथे सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने या जागेला विशेष महत्त्व आहे. बौद्ध धर्मीयांची या वास्तूमध्ये श्रद्धा गुंतलेली आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार हे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात असले पाहिजे. तसेच बिहार सरकारने महाबोधी महाविहार संदर्भात 1949 चा टेम्पल ऍक्ट जो लागू केला आहे तो बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने काळा कायदा आहे. तो कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत मूक आंदोलन तसेच लाक्षणिक उपोषण करून बुद्ध गया येथील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. बिहार व केंद्र सरकारने याबाबत तातडीने लक्ष घालावे अन्यथा समस्त बौद्ध जनतेला विश्वव्यापी आंदोलन करून त्याची तीव्रता वाढवावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युक्रेनबाबत अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यास रशियाचा नकार
पुढील बातमी
सातारा पालिकेच्या तिजोरीत तब्बल 44 कोटी 50 लाखाचा महसूल जमा

संबंधित बातम्या