पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन

वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास

by Team Satara Today | published on : 18 June 2025


सोलापूर : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 वर्षी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते आजारी आणि अंथरुणातचं होते. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांनी एकूण 5 लाख किमी प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली.  त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केलं.

अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली. 

मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अतिशय दुःखद बातमी आहे. मराठी साहित्यामध्ये निसर्ग चित्रणाची वाट मारुती चितनपल्ली यांनी निर्माण केली आणि त्यांचे संबंध लेखक वाचत असताना आपण रानातून वनातून जंगलातून फिरतो, पशुपक्षी प्राणी आपल्याशी संवाद साधतात असा आपल्याला भास होत होता. अतिशय ललितरण्य अशी त्यांची शैली होती. म्हणजे अभ्यास आणि व्यासंगाला शैलीची जोड देऊन त्यांनी जे काही लेखन केलं. त्यामुळे मराठीमध्ये एक वेगळी हिरवी वाट त्यांच्या लेखनाने निर्माण झाली.

भाजपचे नेते आणि माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, वन, पशुपक्षी याचा एक अतिशय गाढा अभ्यासक गमावलाय. ही एक मोठी हानी झाली. या क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या व्यक्तिमत्वांची संख्याच एवढी दुर्मिळ आहे आणि त्यामध्येही मारुती चितमपल्ली म्हणजे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. मारुती चितमपल्ली यांचा अभ्यास पाहून भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरवले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरोग्य विभागाने डावलला कॅथलॅबचा नियम
पुढील बातमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर पोलिसांच्या 19 वाहनांचा मोठा अपघात

संबंधित बातम्या