खटाव : नववधूनेनही स्वत:च्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत पतीला शुभेच्छासह देशसेवेसाठी जाण्याची परवानगी दिली. या नवदांपत्याचे व कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. काळेवाडी येथील जवान प्रसाद काळे हा आपल्या लग्नासाठी एक महिन्याची सुटी काढून गावी आला होता. 1 मे रोजी तो वैष्णवी हिच्याशी विवाह बंधनात अडकला. लग्नानंतरचे धार्मिक विधी सुरू होते.
लग्नाची पूजा चालू असताना सैन्य दलातील आर्मड रेजिमेंट अमृतसरच्या युनिटमधून तातडीने हजर राहण्याचा संदेश आला. त्यावर जवान प्रसाद भावनिक नात्यात न गुंतता कुटुंबातील व्यक्तींना धीर देत पुन्हा देशसेवेसाठी जाण्यासाठी तयार झाला. देशाच्या संरक्षणासाठी हातावरील मेंदी, ओली हळदसोबत घेऊनच पूजेच्या दुसऱ्याच दिवशी तो नववधूसह कुटुंबाचा निरोप घेऊन देशसेवेसाठी रवाना झाला. पती वैष्णवीनेही मोठ्या मनाने पतीला देशसेवेसाठी आनंदाने निरोप दिला. या दोघांही नवदांपत्यांचे कौतुक आहे.
कोरोना काळातही जवान प्रसाद सुटीला गावी आला होता. त्या वेळी त्याला क्वारंटाइन व्हावं लागले होते. कुटुंबाच्या व गावच्या काळजीपोटी घरासमोरील चारचाकी गाडीत राहून त्याने क्वारंटाईनचा कालावधी घालवला. कुटुंबात एकत्र राहण्याची वेळ आली आणि त्यावेळी त्याची सुटी संपली होती. या वेळी लग्न झालं, की त्याला लगेच ड्यूटीवर हजर व्हावे लागले.
लग्नानंतर पूजेदिवशी मला युनिटमधून फोन आला, की आपली सुटी रद्द करण्यात आली असून, तातडीने युनिटमध्ये हजर राहा. याची कल्पना मी कुटुंबाला देताच सर्वांचा चेहरा पडला, तरीही सर्वांनी मला दुसऱ्या दिवशी आनंदाने निरोप दिला. त्यामुळे पूजेच्या दुसऱ्यादिवशी मी देशसेवेसाठी रवाना झालोय. - प्रसाद काळे (जवान) काळेवाडी, ता. खटाव
आमचं नुकतंच लग्न होऊन पूजेच्या दुसऱ्यादिवशी ते ड्यूटीवर जाणार असं समजलं, की थोडं वाईट वाटलं; पण देशाची सेवा करण्यासाठी ते जात आहेत याचा मला अभिमान आहे. म्हणून मोठ्या आनंदाने मी देशसेवेसाठी माझं कुंकू पाठवलंय.- वैष्णवी काळे, नववधू काळेवाडी, ता. खटाव