मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व शाळांमध्ये पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाने १४ ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाला याबाबत पत्र पाठवले आहे.
पसायदान करणे अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद तसेच संस्थात्मक शाळांसाठी हे पठण बंधनकारक आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी, १५ ऑगस्ट रोजी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त, झेंडावंदन, प्रभातफेरी यांसारखे पारंपरिक कार्यक्रम होणार असल्याने, पसायदान पठणाचा कार्यक्रम १४ रोजी घेण्याचे आदेश आहेत. अनेक शाळांनी याची तयारी सुरू केली असून, काही शाळांत पत्र मिळताच पसायदान सुरू होईल.
सर्व समाजस्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार, शिक्षण विभागाने ३१ जुलै रोजी सर्व शाळांना पसायदान पठण करण्याचे आदेश दिले. अलीकडेच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग उठले होते. सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर पसायदान पठण उपक्रमाला मात्र समाजातील सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रम मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. मंत्रालयातील बैठकीत मंत्री भुसे यांनी विभागाचा आढावा घेतला. जिथे शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी वेळेत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शाळांना पूर्वसूचना द्यावी आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिले जावे. शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देण्याच्याही त्यांनी सूचना काही दिवसांपूर्वीच दिल्या आहेत.