यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार

रणजितसिंह देशमुख यांनी स्वीकारला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 14 June 2025


सातारा : सातारा जिल्ह्याने लोककल्याणकारी सुसंस्कृत राजकारणाचा यशवंत विचार संपूर्ण देशाला दिला आहे. तोच यशवंत विचार सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नव्या उमेदीने पोहोचवणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढल्या जातील, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले.

येथील काँग्रेस कमिटी मध्ये अत्यंत औपचारिक कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्याकडून स्वीकारला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव राजेंद्र शेलार, जिल्हा युवक काँग्रेस अमरदीप कांबळे, सरचिटणीस नरेश देसाई, रजनीताई पवार तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उर्जित अवस्था आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकतीने लढल्या जातील. याबाबतची रणनीती कार्यकर्त्यांशी संवाद साधून लवकरच स्पष्ट केली जाणार आहे. सातारा जिल्ह्याचा सुसंस्कृत राजकारणाचा यशवंत विचार पुन्हा एकदा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्या उमेदीने पोहोचवणार असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या आगामी वाटचालीला मी शुभेच्छा देत आहे. आगामी काळामध्ये काँग्रेसच्या बैठका, सदस्य नोंदणी आणि विचारमंथन कार्यशाळा या अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये घेतल्या जातील. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला जाणार असून यामध्ये आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यूहरचनेसाठी कार्यकर्त्यांशी संवाद मेळावे घेऊनच काँग्रेस पुढील राजकीय मांडणी लवकरच करणार असल्याचे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता
पुढील बातमी
संदीप रिटे खून प्रकरणातील दोनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या