प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे साताऱ्यात रविवारीआयोजन

स्वागताध्यक्ष प्रा. श्रीधर साळुंखे व कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांची माहिती

by Team Satara Today | published on : 09 September 2025


सातारा, दि. ९  : येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्यावतीने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार, दि. 14 रोजी दैवज्ञ सांस्कृतिक हॉल समर्थ मंदिर चौक सातारा येथे एक दिवसीय प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीधर साळुंखे व कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी दिली.                                                                                    या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक व. बा. बोधे, उद्घाटकपदी ज्योतिषाचार्य प्राध्यापक मंडळ शहा व स्वागताध्यक्षपदी नगर वाचनालयाचे विश्वस्त सीए विजयकुमार क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्राध्यापक बोधे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता द्वितीय सत्रात साहित्य संमेलनांकडून मराठी रसिकांच्या अपेक्षा हा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली डमाळ शिवाजी विद्यापीठाचे माजी प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, व्याख्याते निरंजन फरांदे, लेखक प्रा. अनिल बोधे, मुद्रक प्रकाशक विशाल देशपांडे सहभागी होणार आहेत. 'गप्पागोष्टी' साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सदरात दुपारी साडेबारा वाजता प्रसिद्ध लेखक नितीन दीक्षित, अभिनेते मकरंद गोसावी, संवाद व पटकथा लेखक विशाल कदम सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे संवादक म्हणून भूमिका बजावणार आहेत. तसेच नाट्यकलेच्या सलग ५० वर्षे सेवेबद्दल तुषार भद्रे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.साहित्य संमेलनाच्या सत्रात अडीच वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे.                                                                                                                    या कवी संमेलनात गझलकार वसंत शिंदे या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी असून प्रदीप कांबळे, चंद्रकांत कांबिरे, राहुल निकम, ॲड. अनिल गोडसे, ताराचंद आवळे, प्रा. युवराज खरात, आनंद ननावरे, अश्विनी कोठावळे, विलास वडे, राजेंद्र गाडगे, कांता भोसले, ॲड. सरिता व्यवहारे, डॉ. आदिती काळमेख, निलेश महिगावकर, प्रा.  प्रकाश बोधे, सीमा मंगरुळे इत्यादी कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत. पाचव्या व शेवटच्या सत्रात प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानुगडे नाटककार प्राध्यापक दिलीप जगताप यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य असून संमेलनात जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अश्वमेध वाचनालयाचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती झुटिंग व संचालक साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा क्लबच्या पदाधिकाऱ्यांविरुद्धचा फसवणुकीचा खटला न्यायालयाने काढून टाकला
पुढील बातमी
महादेवाच्या डोंगरावरील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले

संबंधित बातम्या