सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 65 गट आणि 130 गाण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुलाखतींचे सत्र साताऱ्यात येथील लेक व्ह्यू हॉटेलच्या दालनामध्ये पार पडले. दिवसभर चाललेल्या या मुलाखतींमध्ये 208 उमेदवारांनी मुलाखती देऊन गटा व गणासाठी आपली उमेदवारी ग्राह्य धरावी अशी विनंती केली आहे. कराड दक्षिणचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी लोकसंग्रह उत्तम जनसंपर्क आणि विकास कामे खेचून आणण्याची क्षमता असणारे उमेदवार हे गटासाठी आणि गणासाठी दिले जातील अशी स्पष्ट ग्वाही प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली
गोडोली येथील हॉटेल लेक व्ह्यू च्या प्रशस्त दालनामध्ये दि. 17 व 18 रोजी मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी तब्बल 415 उमेदवार उपस्थित होते पैकी 208 उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या .यामध्ये माणं खटाव वाई खंडाळा महाबळेश्वर आणि फलटण या सहा तालुक्यातील उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. सर्व उमेदवारांची लेखी माहिती विहित नमुन्यांमध्ये भरून घेण्यात आली.
या मुलाखतींच्या माध्यमातून पक्षनिष्ठा, जनतेशी असलेला संपर्क, विकासाची दृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्वगुण यांचा सखोल आढावा घेण्यात आला.तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देत, सक्षम व जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील अशा उमेदवारांची निवड करण्याचा हा प्रयत्न आहे.
लोकहित, विकास आणि पारदर्शक प्रशासन या ध्येयानेच आगामी निवडणुकांसाठी सक्षम संघटन उभारले जात असून, सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.यावेळी आमदार मनोज घोरपडे जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार मदनं भोसले, मलकापूर नगराध्यक्ष मा. तेजस सोनवले, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.