मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे ९०.३, रायगड १३४.१, रत्नागिरी ६०.९, सिंधुदुर्ग ९.४, पालघर १२०.९, नाशिक ४०.३, धुळे २५.५, नंदुरबार ३३.४, जळगाव ४.७, अहिल्यानगर ८.७, पुणे २९.३, सोलापूर ०.३, सातारा १७.७, सांगली ५.९, कोल्हापूर १२.१, छत्रपती संभाजीनगर ४.५, जालना २.१, बीड ०.२, धाराशिव ०.२, नांदेड ०.६, परभणी ०.५, हिंगोली ०.८, बुलढाणा ३.१, अकोला ८.६, वाशिम १.७ अमरावती ५.९, यवतमाळ १.२, वर्धा ३.२, नागपूर ०.७, भंडारा ०.३,चंद्रपूर ४.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक पाळणा तुटून एक व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी व पाताळगंगा नदीने इशारा पातळी पार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी पार केली असून. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नारुर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला आहे. जवळील लोखंडी पूलावरून नागरिकांचे दळणवळण चालू आहे. मौजे कुचंबे ता. संगमेश्वर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने तहसीलदार संगमेश्वर यांच्यामार्फत योग्य कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
तसेच ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा 18 जूनला सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 19 जूनला रात्री 11:30 वाजेपर्यंत देण्यात आला असून या कालावधीत समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. या दरम्यान समुदामध्ये लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही ईशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले.