बदलापूर : बदलापूर प्रकरणी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली असून या समितीच्या अहवालावर बुधवारी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केसरकरांनी ‘पॅनिक बटण’वर देखील महत्त्वाचं सुतोवाच केलं आहे.
दीपक केसरकर म्हणाले, “एकत्र समिती स्थापन केली आहे. या समितीला महिला आयोगाच्या अध्यक्ष, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि आयजी पोलीस विभागाला विशेष मार्गदर्शक म्हणून बोलावलं आहे. याचा सविस्तर अहवाल उद्या प्राप्त होऊन बुधवारी यावर चर्चा करू. महाराष्ट्रातील एकंदर निर्णय त्यावेळी जाहीर करू. कॅबिनेटमध्ये यामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे.”
“शाळा आदिवासी विकास खात्याच्या शाळांवर आमचा थेट कंट्रोल येत नाही. एकाच विभागाचं पूर्ण नियंत्रण शाळा प्रशासनावर असावा. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग या दोघांचंही नियंत्रण आमच्या शाळांवर असतं. त्यामुळे अनेकवेळा अंमलबजावणीत स्मुथनेस राहत नाही. जिल्हा परिषदेचे सीईओच्या पातळीवर निकाल होत असतात. शिक्षकांसंदर्भातील निर्णय शिक्षण विभागाकडे देण्यात यावे असं बोलणं झालंय.” असंही दीपक केसरकर म्हणाले.
“असं प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल. महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीत झाला. मी राज्यमंत्री होतो तेव्हा मी एक प्रस्ताव सादर केला होता. आपण पॅनिक बटण शाळांमध्ये लावावं आणि महिलांना द्यावं. महिला आणि मुलं अडचणीत आल्यावर पॅनिक बटण दाबल्यास पोलिस ठाण्यात त्वरीत माहिती कळते. मग ट्रॅकिंग सिस्टममुळे पोलिसांपर्यंत ही संबंधित व्यक्ती कुठे गेली हे समजतं. ही सिस्टम ऑफलाईनही चालते. हैदराबादमधील एका कंपनीने हे बटण तयार केलं आहे. हे सुरू केलं तर अशा घटनांवर नियंत्रण येईल.” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.