सातारा : केंद्र शासनाने घरगुती गॅसचे दर पन्नास रुपयांनी वाढवलेले आहेत. त्याचा सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेस अंतर्गत असणार्या शक्ती अभियाना अंतर्गत जाहीर निषेध करण्यात आला. त्यानुषंगाने पोवई नाका येथील भर चौकात चूल पेटवून भाकरी करण्यात आल्या.
पेटलाय गॅस विझवा सरकार, मोदी हटाव देश बचाव, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. निषेध व्यक्त करत असताना सुषमा राजेघोरपडे म्हणाल्या की, मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींचा तोंडाला पाणी पुसले आहे. गॅस दरवाढ करून त्यांच्या दैनंदिन बजेट कोसळवण्याचं काम सरकारने केले आहे. सर्वसामान्य जनतेला आणि गृहिणींना याचा फार मोठा फटका बसणार आहे. गॅसच्या किंमती पन्नास रुपये वाढवायच्या आणि पंधरा दिवसांनी दहा ने कमी केल्या, अशी बातमी करून लोकांना फसवण्यात हे सरकार तरबेज आहे.
गॅसचे दर येणार्या काळात सुस्त झाले नाहीत तर कॉंग्रेसच्या वतीने आणि शक्ती अभियान च्या वतीने मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्राची ताकतोडे, वृषाली जाधव, अरबाज शेख, विजय मोरे, आशा साळुंखे, कांताताई साळुंखे, रोहिणी यादव, धनश्री मालुसरे, अंजली कांबळे, श्रीकांत कांबळे, मोहनराजे घोरपडे, नंदकुमार खामकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.