मोहरम सणादिवशी तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन वादावर अखेर कायमचा पडदा; मार्डी येथील तीन भावांच्या नात्यात पुन्हा सलोखा

by Team Satara Today | published on : 28 June 2026


दहिवडी  : सत्य, त्याग, मानवता आणि बंधुभावाची शिकवण देणाऱ्या मोहरम सणादिवशीच तब्बल वीस वर्षांपासून कटुतेने दुरावलेल्या तीन भावांच्या नात्यात पुन्हा सलोखा निर्माण झाला. पोलिस यंत्रणेच्या मध्यस्थीने झालेल्या या सामोपचारामुळे मार्डी (ता. माण) येथील केवळ एका जमीनवादाचा शेवटच झाला नाही, तर मानवतेचा आणि ऐक्याचा नवा संदेशही सर्वत्र पोहोचला आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपावरून मार्डीतील मुलाणी कुटुंबातील सख्खे चुलत भाऊ सलीमभाई, नजीरभाई व पिरखान यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती. काही जमिनी संयुक्त मालकीच्या असल्याने वारंवार मतभेदही निर्माण होत होते. या वादातून अनेकदा तक्रारी होऊन प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत देखील पोहोचली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये कायमच ताणतणावाचे वातावरण होते. या वादामुळे एकाच रक्ताच्या नात्यातील माणसे एकमेकांपासून दुरावल्याने गावकऱ्यांनाही याची खंत वाटत होती. हा वाद कायमचा मिटवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्नही सुरू होते.

मात्र, त्यात तितकेसे यश मिळत नव्हते; परंतु गेल्या काही महिन्यांपासून दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे व मार्डीचे पोलिस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही पक्षांशी संयमाने संवाद साधत त्यांनी अनेक बैठका, चर्चा करत परस्परांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. याचाच सकारात्मक परिणाम झाला आणि मोहरम सणादिवशीच हा वाद मिटविण्यात यश आले.

तिघाही भावांनी शांतता, संयम आणि संवादाचा मार्ग स्वीकारत मोठेपणा दाखवत सामोपचाराचा मार्ग स्वीकारल्याने अखेर तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर कायमचा पडदा पडला


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या २८ झाडांना जीवदान ; बांधकाम विभागाच्या यशस्वी उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक
पुढील बातमी
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकला वॅगनआर कारची मागून जोरदार धडक; एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत

संबंधित बातम्या