सातारा : कर्ज थकबाकीमुळे फायनान्स कंपनीने जप्त करून बंद केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून पुन्हा वास्तव्य केल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्ये येथील विजया बँक एटीएमसमोरील घर टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स कंपनीने अधिकृतरीत्या सील केले होते. मात्र काही दिवसांनंतर संबंधित मालमत्तेत पुन्हा वास्तव्यास असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले. तपासात कर्जदारांनीच कुलूप तोडून प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.
कंपनीचे प्रतिनिधी प्रकाश नवांगे (रा. पुणे) यांच्या तक्रारीवरून बाळासाहेब जाधव आणि सविता जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.