सातारा : साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कवी कट्टा समितीचे गठण करण्यात आले आहे. ९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही समिती गठीत केली आहे. या समितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना संधी देण्यात आल्याची माहिती ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर जानेवारी २०२६ मध्ये ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून विविध संस्थासमवेत बैठकाही झाल्या आहेत.
संमेलनाचे नियोजन नेटके आणि वैशिष्टयपूर्ण व्हावे यासाठी विविध समित्या तयार करण्याचे काम सुरु आहे. नुकतेच मार्गदर्शन समिती, स्मरणिका संपादन समिती, ग्रंथदिडी, शोभायात्रा समिती, साहित्यिक व ऐतिहासिक दालन समिती जाहीर करण्यात आली आहे. आता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कवी कट्टा समिती गठीत करण्यात आली आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साजेसा कवीकट्टा होईल, अशी खात्री आहे. हा कवीकट्टा दीर्घ काळापर्यंत सातारकरांच्या स्मरणात राहील, अशी अपेक्षा श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या समितीचे मुख्य समन्वयक सविता कारंजकर तर सह समन्वयक श्रीकांत तारे हे असून विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत मार्गदर्शक आहेत. समितीच्या सदस्यांमध्ये दिनेश फडतरे, ऐश्वर्या भोसले, अंजली गोडसे, स्वाती चव्हाण, अश्विनी कोठावळे, मनीषा शिरटावले, शैलेश ढवळीकर, जयंत लंगडे यांचा समावेश आहे.