लोकसहभागाशिवाय गावाला गावपण नाही : मंत्री जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 13 January 2025


सातारा  : राज्याचे ग्रामविकासमंत्री ग्रामविकासाचे रोलमॉडेल असलेल्या आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये शनिवारी चांगलेच रमले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय गावाला गावपण नाही, असे सांगून मंत्री जयकुमार गोरे यांनी लोकसहभागातील आदर्श गावपण सर्वच बाजूंनी अभ्यासले.

ना.गोरे यांनी शनिवारी हिवरे बाजारला भेट दिली. हिवरे बाजारमधील लोकहिताच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. याप्रसंगी आ. राहुल कुल, आ. काशिनाथ दाते, सातारा जिल्हा भाजल शिंदे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार येळाई, दादाभाऊ गुंजाळ, शरद मगर, बाबुराव जाधव, अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले, हिवरेबाजार ग्रामस्थांनी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कामात श्रमदानाच्या स्वरूपात तसेच लोकवर्गणीच्या स्वरूपात योगदान दिले आहे. त्यामुळेच हिवरे बाजारच्या प्रत्येक नागरिकाला विकास कामांविषयी अभिमान वाटतो. लोकसहभागाशिवाय गावाला गाव पण नाही. हिवरे बाजारच्या धर्तीवर पद्मश्री पोपटराव पवारांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात ग्रामविकासाची कामे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्यावर असून सुरुवातीलाच हिवरे बाजाराला भेट देण्याचे निश्चित केले होते. ग्रामविकासाची कामे करताना पोपटराव पवारांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाणार असून नवी संकल्पना घेऊन राज्याच्या ग्रामविकासाचा गाडा प्रगती पथावर नेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोपटराव पवार यांनी गावांमध्ये आरोग्य, शेती, जलसंधारण, शिक्षण, पर्यटन, कौशल्य विकास, पिकांचे नियोजन, गावातील अर्थकारण, अशा विविध क्षेत्रात केलेले काम पाहिल्यावर हिवरे बाजार हे केवळ एक गाव नाही तर ते परिपूर्ण विकासाचं आदर्श संकल्पचित्र आहे. हिवरेबाजार गावात शाश्वत विकासातून समृद्धीकडे केलेली वाटचाल अतुलणीय आहे. गावाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले पुरस्कार हिवरेबाजारच्या विकासाचा गोषवाराच सांगतात.

गावची शाळा, लहान मुलांसोबत त्यांची असणारी मैत्री, त्यांनी केलेले काम, त्यांच्याकडे असणारे ज्ञानभांडार त्यांच्या शब्दातून सहज जाणवले असेही ना. गोरे यांनी शेवटी सांगितले. यावेळी सरपंच विमल ठाणगे, चेअरमन बाबुराव ठाणगे, व्हाईस चेअरमन रामभाऊ चित्तर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार
पुढील बातमी
सीसीटीव्ही फोडून शेडमधील सोळा बकऱ्यांची चोरी

संबंधित बातम्या