NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 26 जुलैला विद्यार्थी-पालकांसह मुंबईत विराट मोर्चा, सरकारला इशारा

by Team Satara Today | published on : 24 July 2026


मुंबई : ‘नीट’ पेपरफुटीवरून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे लोण देशभर पसरत आहे. देशात ज्या पद्धतीने सत्ता राबविली जात आहे, त्याविरोधातील लोकांचा राग उफाळून बाहेर येत असल्याचे सांगत उद्धव व राज या ठाकरे बंधूंनी येत्या रविवारी (दि. २६) मुंबईत संयुक्त मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करणार असल्याची घोषणा केली. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकदरम्यानच्या या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, केवळ देशाचा तिरंगा असेल, असे स्पष्ट केले.

ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.

सिद्धिविनायकाला साकडे

हा केवळ मोर्चा नाही, तर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या भावना व्यक्त करणारे शक्तिप्रदर्शन असेल. मोर्चाने सिद्धिविनायक येथे जाऊन सरकारला सद्‌बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करू, असे राज ठाकरे म्हणाले. तर, देशाची ताकद दाखवून देण्यासाठीचा हा मोर्चा असून सरकारच्या रूपाने आलेले आरिष्ट दूर कर, असे साकडे बाप्पाला घालणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

यापूर्वी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले

एकूणच, व्यवस्थेच्या विरोधातला राग सर्वजण व्यक्त करत आहेत. एखाद्या खात्यात अपयश आले तर त्याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरुवातीची मागणी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. मात्र, विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर हा प्रश्न आता पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच, भाजपने यापूर्वी अनेकवेळा अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितल्याची आठवणही राज यांनी करून दिली.

जनतेच्या असंतोषाचा उद्रेक

हा केवळ ‘नीट’चा प्रश्न नाही, जनतेच्या असंतोषाचा उद्रेक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नोटाबंदीपासून विविध सरकारी निर्णयांमुळे नाराज असलेले अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

...तर ही परिस्थिती टळली असती

सरकारने वेळीच संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती, असे दोन्ही ठाकरेंनी यावेळी सांगितले. सरकारने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले असते तर एवढा मोठा संघर्ष उभाच राहिला नसता. शेतकरी आंदोलन, मणिपूर आणि आदिवासींच्या प्रश्नांवरही दडपशाहीची भूमिका घेतली, असे राज ठाकरे म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? ; दिल्ली आंदोलनावरून राज ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
पुढील बातमी
आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणे, धमकावणे बंद करा करा - राहुल गांधी ठाम, पोलीस हल्ल्यातील जखमी आंदोलकाला सर्वांसमोर आणले

संबंधित बातम्या