मुंबई : राज्यभरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलीस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. अशी माहिती मिळत आहे.
प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस आयुक्तालयाकडून रिक्त पदांचा आढावा मागितला आहे. 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली आहे. या पोलीस भरतीची सराव चाचणी ही पावसाळ्याआधी करण्याचे नियोजन आहे.
मागच्यावेळी राज्यात 17 हजार पदांची भरती झाली. त्यासाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख अर्ज आले होते. यावेळी देखील अशीच परिस्थिती राहील या पद्धतीने भरतीचे नियोजन करण्यात येणार आहे.