सातारा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळांमधील सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करत ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शाळांमध्ये राबविले जाणारे उपक्रम अधिक परिणामकारक करण्याबरोबरच आढळणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना डॉ. दीपक माळी यांनी दिल्या.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विविध विभागांनी आपल्या कामकाजाचे सादरीकरण केले. शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर यांनी विभागाच्या कामाची माहिती दिली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. अमोल डोंबाळे आणि कृष्णा फडतरे यांनी ‘निपुण महाराष्ट्र’ व ‘PARAKH’ उपक्रमांतर्गत जिल्ह्याची सद्यस्थिती, प्रगती आणि आगामी नियोजन मांडले. परख आणि पीजीआय इंडेक्समध्ये सातारा जिल्ह्याचा राज्यात दुसरा, तर देशात दहावा क्रमांक असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी शाळांमध्ये राबविलेल्या प्रयोगांची माहिती दिली. मनीषा शिरटावले (धनकवडी, जावली), रंजना सानप (मोहितेमळा, खटाव) आणि अंजली गोडसे (PM Shri जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, कुडाळ) यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले.
दरम्यान, डॉ. माळी यांनी पाटण तालुक्यातील संभाजीनगर, वेखंडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच सातारा तालुक्यातील सयाजीराव विद्यालयास भेट देऊन शैक्षणिक कामकाज व भौतिक सुविधांची पाहणी केली.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राचार्य डॉ. जितेंद्र साळुंखे, अधिव्याख्याते, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
गुणवत्तेच्या कसोटीवर साताऱ्याच्या शाळा; जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विविध विभागांनी केले कामकाजाचे सादरीकरण
by Team Satara Today | published on : 10 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा