सातारा : पुणे येथे बदली ड्रायव्हरचे काम आहे म्हणून सांगत एक जण निघून गेले होते. त्यांच्या मोबाईलवर ‘सॉरी मी माझी जीवनयात्रा येथे संपवत आहे,’ असा मजकूर मोबाईलवरती स्टेटसला ठेवला होता. त्यांचा तपास सुरु असतानाच आज त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
निखिल दिलीप गलांडे (वय 40, रा. 413 सोमवार पेठ, सातारा) हे दि. 4 रोजी दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून बेपत्ता झाले होते. त्याबाबतची फिर्याद नंदा दिलीप गलांडे (वय 57) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, निखिल गलांडे यांनी घरच्यांना पुणे येथे बदली ड्रायव्हरचे काम आहे, असे सांगून दि. चार रोजी घराबाहेर गेले आहेत. घरच्यांनी त्याच्या मोबाईल स्टेटसला पाहिले असता ’सॉरी मी चुकून कोणाचे मन दुखावले असल्यास माफी मागतो. मी माझी जीवनयात्रा संपत आहे’ असा मजकूर दिसून आला. त्याला अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पोलीस हवालदार माने यांच्याकडे तपास आहे. त्यांनी आज, दुपारी 12 च्या सुमारास कुटुंबियांना तपासासाठी बोलावले होते. या दरम्यान त्यांचा गलांडे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले. ते दोन दिवसांत सातारा येथे येणार असल्याचे हवालदार माने यांनी सांगितले.