सातारा, दि. १३ : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी जागा खरेदी व घरकुल बांधणी अर्थसाह्याचा पहिला हप्ता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी वासोळे व कोंढावळे येथील लाभार्थीना जमीन खरेदी अर्थसहाय्य तसेच पाचवड येथील शासकीय जमीन दिलेल्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. प्रधानमंत्री जनमन योजना ही आदिवासी व वंचित घटकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना असून, त्याअंतर्गत कातकरी समाजातील नागरिकांना घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरविले जात आहे. जागा नसलेल्या या 22 कातकरी लाभार्थ्यांना पाचवड येथे शासकीय जागा उपलब्ध करण्याचे काम तत्कालीन प्रांताधिकारी श्री राजेंद्र कचरे, तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी आणि तालुका भूमी अभिलेख श्री. साठे यांनी मंत्रिमहोदयांच्या मार्गदर्शनाखाली केले.
वंचित समाजासाठी मी नेहमीच कार्यरत राहीन असेही मंत्री श्री. पाटील यावेळी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद साताराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन आणि प्रकल्प संचालक श्री. विश्वास सिद यांचे पंचायत समिती वाईला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट, विस्तार अधिकारी श्री. शाम राठोड, उमेश भिसे, श्रीमती प्रीतम ओंबळे, पाचवडचे सरपंच महेश गायकवाड यांच्यासह कातकरी लाभार्थी उपस्थित होते.