सातारा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शेंद्रे येथे आले पीक परिसंवाद' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आले उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती दिली. आले लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वतयारी कशी करावी, बेणे निवडताना कोणती काळजी घ्यावी, तसेच बीज प्रक्रिया आणि जैविक खतांचा प्रभावी वापर यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. दर्जेदार उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतीने लागवड करणे आवश्यक असल्याबाबत त्यांनी यावेळी सांगितले. फक्त रासायनिक खताचा वापर करून चालणार नाही तर त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खताशिवाय पर्याय केला.त्यामुळे कुजलेले शेणखत, प्रक्रिया केलेली कोंबडी खत,लेंडी खत व प्रेस मड चा वापर करावा असे सांगण्यात आले.
आले पिक जीवामृत ,घन जीवामृत,ई एम द्रावणाचा वापर, ट्रायकोडर्मा,बीव्हीएम, फुले बायोमिक्स पॅसिलोमयसिस चा वापर केल्यास उत्पादनात चांगल्याप्रकारे वाढ होऊ शकते.याबाबत सविस्तर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पूजा अमित मोरे यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या की, "शेतकऱ्यांनी केवळ आले लागवडीवरच न थांबता, आले प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष द्यावे, जेणेकरून शेतमालाला अधिक मूल्य मिळेल." तसेच, कृषी विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सातारा तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे यांनी प्रास्ताविक करताना यावर्षीचा कमी पर्जन्य मान असताना शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत काय बदल करावेत याबाबत मार्गदर्शन केले.याच बरोबर खरीप हंगामात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमा मध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदऊन आपले उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे अवाहन केले. नागठाणे मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी अजय पवार यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी हेमलता धनाजी फडतरे यांनी केले. या कार्यक्रमास शेंद्रे गावच्या परिसरासह पंचक्रोशीतील आले उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.