मुंबई : राज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून प्रत्येक जिल्ह्यात वंदे भारत धावण्यासाठी तिचे विस्तारीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज (सीएसएमटी) ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. तसेच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिला आहे. त्यामुळे ही वंदे भारत आणखीन दोन जिल्ह्यांना जोडली जाणार आहे.
मुंबईत ये-जा करण्यासाठी, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी राज्यासह देशभरातील महत्त्वाची ठिकाणे वंदे भारतने जोडली जात आहेत. गांधीनगर, शिर्डी, सोलापूर, मडगाव या धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक स्थळांना वंदे भारत जोडली आहे. तसेच मुंबई ते जालना या वंदे भारतमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना जोडली आहे.
आता या मार्गाचा विस्तार झाल्याने परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस हुजूर साहिब नांदेड या रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याची मागणी होती. प्रवाशांच्या मागणीवर विचार करून रेल्वे मंडळाने 12 जून रोजी विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे.
दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे देण्यात आले आहेत.