जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा :  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असून ही जयंती देशासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साजरी करण्यात येणार आहे.  महाराजांच्या जयंती निमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा सातारा शहरातून काढावयाची आहे, याचे दिमाखदार नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा उपनिबंधक संयजकुमार सुद्रिक, नगर पालिका प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जय शिवाजी जय भारत पदयात्रा ही राजवाडा, राजपथ मार्गे, शिवतिर्थ, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशी राहील, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, पदयात्रेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा. जयंती दिवशी संपूर्ण शहर शिवकालीन झाले पाहिजे. यासाठी शिवकालीन साहसी खेळांचे चौकाचौकात आयोजन करावे. पदयात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजुला रांगोळ्या काढाव्यात.

आरोग्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी आरोग्य शिबीराचे आयोजनाबरोबर रक्तदान शिबीर व पदयात्रा मार्गावर जीबीएस आजारा विषयी जनजागृती करावी. योग प्रशिक्षणाचेही  आयोजन करावे. या पदयात्रेमध्ये सातारा जिल्ह्यातील कलावंत, क्रीडा संघटक यांच्यासह शिवप्रेमींचाही सहभाग असला पाहिजे. शिवतिर्थावर पोलीस बँन्ड पथकाने मानवंदना द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा भव्य दिव्य अशी झाली पाहिजे यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले.

मागील बातमी
महेश मांजरेकरांच्या 'देवमाणूस'चा उत्कंठावर्धक टीझर रिलीज
पुढील बातमी
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्याला आग

संबंधित बातम्या