तालुका व गावपातळीवर आढावा घेऊन मान्सुन पूर्व तयारीचे आराखडे 20 मे पूर्वी सादर करावेत : जिल्हाधिकारी पाटील

by Team Satara Today | published on : 08 May 2025


सातारा :  हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊसमानाचे अंदाज वर्तवले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी व विभागांनी तालुका व गावपातळीवर मान्सुन पूर्व तयारीचा आढावा घेऊन आराखडे 20 मे पूर्वी सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा मान्सूनपूर्व तयारी व उपायोजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, धरण विभागांचे कार्यकारी अभियंत्यांसह आदी कार्यकारी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संभाव्य पुर परिस्थिती उद्भवल्यास, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून मनुष्य व पशुंची जिवीतहानी होऊ नये यासाठी सर्वच विभागांनी सतर्क रहावे असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, मागील गेल्या काही वर्षात पडलेल्या सरासरी पर्ज्यन्यमानाची, पूर संवेदशील गावांची व पूर परिस्थीतीची, धरणांतील पाण्याची आवक, सोडलेल्या पाण्याचा विसर्ग,  दरड प्रवण ठिकाणांची माहिती घेऊन करण्यात येणा-या उपायोजनांचा मार्गदर्शक आराखडा सादर करावा.  मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव कार्याच्या साहित्याची चाचणी करावी.  गावस्तरावर पुरविण्यात आलेले साहित्य उत्तम स्थितीत असल्याचीही खात्री करावी.

 पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची साफसफाई मोहीम राबवा. विद्युत विभागाने या काळात वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या मान्सुनपूर्वी कापून घ्याव्यात. विद्युत डीपींची देखभाल दुरुस्ती करुन घ्याव्यात.  भूस्खलन व दरडप्रवणाची शक्यता असणाऱ्या गावांमध्ये ‍बचावाची प्रशिक्षणे व जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. वारंवार पडझड होणाऱ्या घरांची तसेच धोकादायक इमारतीची माहिती घेऊन संबंधित घरमालकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुचना द्याव्यात.  शहर व गावांतील विशेषत: हायवे लगतच्या मोठ्या होर्डिंग्जचे स्ट्रॅक्चरल ऑडीट करावे. विनापरवानगी होर्डींग तात्काळ काढून टाकावीत.  पावसामुळे संपर्क तुटण्याची शक्यता असणाऱ्या गावांमध्ये अगोदरच अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचा व औषधांचा पुरवठा करावा.  दरडी कोसळून रस्ते वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक त्या उपाय योजना तयार ठेवाव्यात. पुर परिस्थिती व दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यास बाधित कुटूंबाना तात्पुरत्या स्थलांतरणसाठी उपलब्ध असणारे शेड, निवारा ठिकाणांची माहिती घेऊन स्वच्छता व डागडूजी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी पाटील यांनी दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाचगणीतील भू-माफिया संतोष शेडगे चा जामीन अर्ज फेटाळला
पुढील बातमी
सैनिक शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवावी : मंत्री दादा भुसे

संबंधित बातम्या