मुंबई : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहाबाहेर मराठा तरुणांनी अचानक घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनाचा प्रयत्न हाणून पाडला आणि सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.
ही घटना अचानक घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक अचानक एकत्र आल्याने पोलिसांचीही धांदल उडाली. सह्याद्री अतिथीगृह परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहात महायुतीतील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होती, या बैठकीत तिन्ही पक्षांमधील समन्वयावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भविष्यात महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद दिसू नयेत, यासाठी एक प्रकारची आचारसंहिता किंवा समन्वयाची ठोस रूपरेषा तयार करण्याबाबत चर्चा होऊ शकते. यापूर्वी विविध धोरणात्मक निर्णयांवर महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे आता तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला संवाद आणि समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
जनतेला एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न
महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असून तिन्ही पक्ष एकत्र आहेत, असा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचाही या बैठकीत प्रयत्न होणार असल्याचे सांगितले जात आहे. घटक पक्षांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीनंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र भोजनही करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे सह्याद्री अतिथीगृहाबाहेर मराठा तरुणांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असताना, दुसरीकडे महायुतीतील एकजूट आणि समन्वयावर होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.